

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि पाकिस्तान यांच्यात जेव्हा जेव्हा क्रिकेट सामना रंगतो तेव्हा दोन्ही देशांचे चाहते खूप उत्साहित होतात. या महामुकाबल्यादरम्यान उत्साह आणि तणाव शिगेला पोहोचतो. अलीकडेच, उभय देशांचे संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकमेकांसमोर आले. ज्यामध्ये भारताने 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. आता पुन्हा एकदा दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येतील. अगामी आशिया कप 2025 मध्ये दोन्ही संघ तीनदा एकमेकांना भिडताना दिसत आहेत. (India vs Pakistan Matches Asia Cup 2025)
वृत्तानुसार, आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया कपचे अंदाजे वेळापत्रक अंतिम केले आहे. यंदा ही स्पर्धा टी-20 स्वरूपात खेळवली जाईल. ज्यामध्ये एकूण 19 सामने असतील. ते सप्टेंबरच्या दुसऱ्या ते चौथ्या आठवड्यादरम्यान खेळवले जातील. परंतु आतापर्यंत त्याचे ठिकाण आणि तारखांबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. यावेळी, भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, यूएई, ओमान आणि हाँगकाँग हे आठ संघ स्पर्धेत सहभागी होतील. गेल्या वेळी नेपाळनेही भाग घेतला होता, जो यावेळी स्पर्धेत सहभागी नाही.
आशिया कपचे मूळतः भारताकडे यजमानपद आहे. पण भारत-पाकिस्तान संबंधांमुळे एसीसीने ही स्पर्धा तटस्थ देशात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे अशी जोरदार चर्चा सुरू आहे.
यापूर्वी 2023 मध्ये आशिया कपमध्ये झाला होता. त्यावेळी तो एकदिवसीय स्वरूपात खेळवण्यात आला होता, ज्यामध्ये भारतीय संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. गेल्या वेळीप्रमाणे, यावेळीही आशिया कपमध्ये 8 संघांना प्रत्येकी चार अशा दोन गटात विभागले जाईल. वृत्तानुसार, भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असतील. यानंतर, प्रत्येक गटातील टॉप-2 संघ सुपर-4 फेरीसाठी पात्र ठरतील. सुपर-4 फेरीच्या पॉइंट टेबलमधील टॉप-2 संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.
अशा परिस्थितीत, भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकदा ग्रुप स्टेजमध्ये आणि एकदा सुपर-4 मध्ये सामना होऊ शकतो. जर दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केली तर ते अंतिम फेरीतही भिडतील. अशाप्रकारे, 2025 मध्ये आपल्याला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामने पाहण्याची पर्वणी मिळू शकते.