

दुबई; वृत्तसंस्था : भारत-पाकिस्तान हे कट्टर, पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ रविवार, दि. 14 आशिया चषकात आमनेसामने भिडत आहेत. या सामन्यात अनेक खेळाडूमध्ये जुगलबंदी रंगणार आहे. चला जाणून घेवूया...
भारताचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा पॉवरप्लेमध्ये फिरकीवर तुटून पडण्यासाठीच ओळखला जातो. येथे मात्र मोहम्मद नवाजविरुद्ध त्याची जुगलबंदी कशी रंगणार यावर बरीच समीकरणे अवलंबून असतील. डावखुरा फिरकीपटू नवाज सुरुवातीच्या सहा षटकांत फलंदाजांची लय बिघडवण्यात निर्णायक वाटा उचलत आला आहे. या पार्श्वभूमीवर अभिषेकचा आक्रमक पवित्रा त्याला फायदेशीर ठरू शकतो किंवा अडचणीतही आणू शकतो. नवाजचा स्टम्प-टू-स्टम्प मारा फलंदाजांना हात मोकळे करण्यास अडथळा निर्माण करतो.
शुभमन गिल पुन्हा एकदा शाहीन आफ्रिदीच्या नवीन चेंडूवरील भेदक गोलंदाजीचा सामना करेल. शाहीनचा उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी फुल लेंग्थ आणि वेगवान इनस्विंग मारा अलीकडील काळात सर्वोत्तम फलंदाजांसाठीही डोकेदुखी ठरला आहे. शाहीन सर्वात धोकादायक असताना पहिल्या काही षटकांत त्याचा सामना करणे हे गिलसाठी सर्वात मोठे आव्हान असेल. उशिरा खेळणे आणि आत्मविश्वासाने चेंडू सोडून देणे त्याच्यासाठी महत्त्वाचे असेल. दुसरीकडे, शाहीनसाठी गिलची विकेट महत्त्वाची असेल.
सूर्यकुमार यादवच्या 360 डिग्री शैलीतील फलंदाजीची परीक्षा सुफियान मुकीमच्या डावखुर्या चायनामन फिरकीसमोर होईल. मुकीम त्याच्या गोलंदाजीतून कमालीचा टर्न मिळवतो आणि गुगली लपवतो. यामुळे फलंदाज चकतात. सूर्यकुमार यादव मात्र स्वीप आणि रिव्हर्स स्ट्रोकसारख्या अभिनव फटक्यांचा वापर करतो. हे द्वंद्व मुकीमची अचूकता आणि सूर्यकुमारच्या अनऑर्थोडॉक्स फलंदाजीमध्ये असेल. जर सूर्यकुमारने आत्मविश्वासाने हल्ला केला, तर पाकिस्तानला मधल्या षटकांत धावा रोखणे कठीण जाईल.
कुलदीप यादवची डाव्या हाताच्या फलंदाजांना गोंधळात टाकण्याची क्षमता फखर जमानविरुद्ध महत्त्वाची ठरेल. फखर एक आक्रमक फलंदाज असून तो फिरकीपटूंविरुद्ध पुढे येऊन फटके मारतो. मात्र, कुलदीपने त्याला यापूर्वीही चकवले आहे. कुलदीप अतिरिक्त फ्लाईट आणि वेगवान बदलांमुळे फखरला चुकीचे फटके मारण्यास भाग पाडतो. विशेषतः, त्याची वेगवान गुगली फखरसाठी धोकादायक ठरू शकते. फखरचा मुक्तपणे खेळण्याचा पवित्रा आणि कुलदीपची चतुराई यामधील लढत मधल्या षटकांची दिशा ठरवेल.
जसप्रीत बुमराह आणि आक्रमक सईम अयुब यांच्यातील लढत पॉवरप्लेमध्ये रोमांच निर्माण करेल. सईम सुरुवातीपासूनच वेगवान मारा करतो, विशेषतः त्याचे ड्राईव्ह आणि लॉफ्टेड शॉटस् प्रभावी आहेत. मात्र, बुमराहची अचूकता, यॉर्कर आणि सीम मुव्हमेंट फलंदाजांसाठी नेहमीच कर्दनकाळ ठरत आली आहे. भारत अनेकदा बुमराहवर लवकर विकेट मिळवण्यासाठी अवलंबून असतो आणि तो अयुबला हार्ड लेंग्थ आणि लेट मुव्हमेंटने लक्ष्य करेल, तर पाकिस्तानच्या सुरुवातीच्या फळीला मोठा धक्का बसू शकतो.