

कोलंबो : ‘कभी हाँ, कभी ना’ अशी तळ्यात मळ्यातील भूमिका घेणारा पाकिस्तान सर्वच पर्याय संपत चालल्याने अखेर गुढघे टेकण्यास राजी झाला असून येत्या रविवार, दि. 15 रोजी भारताविरुद्ध खेळण्याची तयारी या संघाने दर्शवली आहे. याबाबत आता केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे.
पीसीबीने यापूर्वी भारताविरुद्ध खेळण्यासाठी 3 अटी आयसीसीसमोर ठेवल्या होत्या. यात वार्षिक महसुलातील वाटा वाढवून मिळावा, बांगला देशसह तिरंगी मालिकेत भारताने सहभाग घ्यावा, तसेच भारतीय संघाने हस्तांदोलन करावे, यावर पाकिस्तानने यात भर दिला होता. मात्र, आयसीसीने या तिन्ही अटी सपशेल फेटाळून लावल्या आणि हा डाव देखील फ सल्याने पाकिस्तान क्रिकेट मंडळाने यू टर्नघेतल्याचे प्रातिनिधिक चित्र आहे.
यापूर्वी, बांगला देशने भारतात येण्यास नकार दिल्यानंतर त्यांना स्पर्धेतून बाहेर करण्यात आले होते. याच्या निषेधार्थ पाकिस्तान सरकारने 15 फेब्रुवारीच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती. मात्र, आयसीसीकडे झालेल्या मॅरेथॉन बैठकांनंतर पाकिस्तानने आपला पवित्रा बदलला असून आता ते कोलंबोत भारताशी भिडण्यास सज्ज झाले आहेत.
पाकिस्तानने हा सामना खेळण्यासाठी भारतासोबतची द्विपक्षीय मालिका पुन्हा सुरू करावी आणि भारत-पाक-बांगला देश अशी त्रिकोणी मालिका खेळवावी, अशा अटी घातल्या होत्या. मात्र, द्विपक्षीय मालिकेचा निर्णय हा सर्वस्वी बीसीसीआयचा असून त्यात आयसीसी हस्तक्षेप करू शकत नाही, असे स्पष्ट करण्यात आले. अखेर कोणत्याही अटींशिवाय पाकिस्तानने मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.