

Shreyas Iyer Vaibhav Suryavanshi IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरचे एक वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या संभाव्य पदार्पणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर अय्यरने दिलेल्या उत्तरानंतर काही चाहत्यांनी त्याच्यावर टीका केली असून, त्याला "अहंकारी" म्हणत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
चेस्टर-ले-स्ट्रीट येथे पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने वैभव सूर्यवंशीच्या संभाव्य पदार्पणाबाबत प्रश्न विचारला. त्यावर श्रेयस अय्यर म्हणाला,
"मी काहीही पाहत नाही. मला काय सुरू आहे हे माहिती नाही. मी तुमच्या बातम्या फॉलो करत नाही. मी ना सोशल मीडिया पाहतो, ना इन्स्टाग्राम वापरतो. त्यामुळे याबाबत मला काहीच माहिती नाही."
त्याच्या या स्पष्ट उत्तराचा काही चाहत्यांनी वेगळाच अर्थ काढला. सोशल मीडियावर अनेकांनी हे उत्तर उद्धट किंवा अहंकारी असल्याची टीका केली, तर काहींनी अय्यरच्या प्रामाणिक उत्तराचे समर्थनही केले.
याच पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने अय्यर यांना विचारले की, उत्कृष्ट कामगिरी करणारा युवा खेळाडू संघात असूनही त्याला संधी न देणे कर्णधार म्हणून किती कठीण असते?
यावर अय्यरने अनुभवी खेळाडूंवर विश्वास कायम असल्याचे सांगितले. तो म्हणाला,
"संघातील प्रत्येक खेळाडूने चांगली कामगिरी केली आहे. केवळ एका खेळाडूनेच उत्कृष्ट खेळ केला असे नाही. ज्यांनी भारताला टी-20 विश्वचषक जिंकून दिला, त्यांना पुरेशी संधी मिळायला हवी. त्यांच्या जागेबाबत असुरक्षितता निर्माण होऊ नये, यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. हे खेळाडू या फॉरमॅटचे आधारस्तंभ आहेत आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे."
श्रेयस अय्यरच्या वक्तव्यावरून इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत मिळत आहेत. यापूर्वी आयर्लंड दौऱ्यातही तो संपूर्ण मालिका बेंचवरचा बसला होता.
मात्र आगामी सामन्यांमध्ये त्याला संधी मिळेल, अशी अपेक्षा चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अय्यरच्या वक्तव्यावरून सुरू झालेली चर्चा अजूनही कायम असून, काही जण त्याच्या स्पष्टवक्तेपणाचे समर्थन करत आहेत, तर काही जण त्याच्या उत्तरावर नाराजी व्यक्त करत आहेत.