

IND vs ENG 2025 Test Yashasvi Jaiswal Shubman Gill strategy
लीड्स : विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीनंतर भारतीय फलंदाजीबाबत चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, भारत आणि इंग्लंड यांच्यात लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी वर्चस्व राखून नव्या पर्वाचा आरंभ केला. सलामीवीर यशस्वी जैस्वालने कर्णधार शुभमन गिलसोबत मिळून इंग्लंडच्या गोलंदाजांवर प्रहार करण्यासाठी एक विशेष रणनीती आखली होती, ज्यामुळे इंग्लंडच्या गोलंदाजांची तारांबळ उडाली.
पहिल्या दिवशी भारताने तीन गडी गमावून ३५९ धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल १२७ धावांवर आणि उपकर्णधार ऋषभ पंत ६५ धावांवर नाबाद राहिले. तर, सलामीवीर यशस्वी जैस्वालने १०१ धावांची शानदार खेळी केली. शतक झळकावल्यानंतर त्याने आपल्या खेळीचा पुरेपूर आनंद घेतल्याचे सांगितले. यशस्वी म्हणाला, 'पहिला दिवस खूप छान होता. सर्वांनी खूप चांगली कामगिरी केली. इंग्लंडच्या परिस्थितीत क्रीजवर जाऊन फलंदाजी करणे विलक्षण होते. मी माझ्या खेळीचा आनंद लुटला. मी खूप चांगली तयारी केली होती. अलीकडच्या काळात चांगले सराव सत्र आणि सामने खेळल्यामुळे ही खेळी सोपी झाली.'
यशस्वी पुढे म्हणाला, 'जेव्हाही मी शतक करतो, मग ते कुठेही असो, मी त्याचा आनंद घेतो. मला हे आवडते कारण माझी सर्व शतके खास आहेत, पण निश्चितच काही क्षण अधिक विशेष असतात. जसे की इंग्लंडमधील हे माझे पहिले शतक.' गिलचे कौतुक करताना तो म्हणाला, 'गिलने शानदार प्रदर्शन केले. तो खूप संयमी आणि शांत होता. त्याने खरोखरच उत्कृष्ट फलंदाजी केली.'
यशस्वीने गिलसोबतच्या भागीदारीबद्दलही सांगितले. यशस्वी म्हणाला, 'आम्ही मैदानावर सतत एकमेकांशी बोलत होतो आणि प्रत्येक सत्रानुसार खेळ पुढे नेण्याचा प्रयत्न करत होतो. शक्य तितक्या धावा काढण्याचा आमचा प्रयत्न होता. आमच्यात चांगली चर्चा होत होती. गिलसोबत फलंदाजी करणे खूप छान होते आणि ज्याप्रकारे त्याने शांत आणि संयमीपणे फलंदाजी केली, त्याची मला खूप मदत झाली.'
शुक्रवारी झळकावलेले हे शतक, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियामध्ये शतक झळकावल्यानंतर परदेश दौऱ्यावरील यशस्वीचे तिसरे शतक ठरले. त्याच्या शतकादरम्यानची वैयक्तिक रणनीती काय होती, असे विचारले असता तो म्हणाला, 'खराब चेंडूंना सन्मान देणे आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी शॉट मारणे हीच रणनीती होती. मी फक्त परिस्थिती हाताळण्यावर लक्ष केंद्रित करत होतो, तसेच इंग्लंडचा संघ क्षेत्ररक्षक कुठे उभे करत आहे किंवा कोणत्या टप्प्यावर गोलंदाजी करत आहे, हेही पाहत होतो. मी त्यानुसार फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होतो. संघाची गरज काय आहे, त्यानुसार मी खेळत होतो.'
यशस्वी दोन महिन्यांच्या आयपीएल हंगामानंतर फारसा सराव न करता थेट कसोटीत उतरला. त्याने सांगितले की, मानसिकदृष्ट्या फॉरमॅटनुसार स्वतःला बदलणे त्याच्यासाठी महत्त्वाचे होते. क्रिकेटमध्ये आव्हाने नेहमीच असतात, फक्त ती वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी असतात. मी माझ्या प्रक्रियेवर आणि मानसिकतेवर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. मानसिक बदल करणे खूप महत्त्वाचे आहे, जसे की तुम्ही कसा विचार करता किंवा तुम्ही कोणत्या वातावरणात आहात हे महत्त्वाचे ठरते.