पुढारी ऑनलाईन डेस्क : R Ashwin Record : भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी टीम इंडियाचा स्टार खेळाडू आर अश्विनने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. अश्विनने या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोला बाद करताच तो आशिया खंडात सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला. या विशेष यादीत त्याने भारताचे माजी दिग्गज लेगस्पिनर अनिल कुंबळे यांना मागे टाकले. कुंबळे 419 विकेट्स घेऊन अव्वल स्थाने होते, मात्र आता अश्विनच्या नावावर आशियामध्ये 420 विकेट्स जमा होताच ते दुस-या स्थानी आले आहेत.
कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. शुक्रवारी (दि. 27) भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी चांगली सुरुवात करून पहिल्या सत्रात बांगलादेशच्या 2 फलंदाजांना बाद केले. या दोन्ही विकेट आकाश दीपच्या खात्यात गेल्या. लंच ब्रेकपर्यंत बांगलादेशने 2 गडी गमावून 74 धावा केल्या होत्या.
लंच ब्रेकसाठी खेळ थांबला तेव्हापासूनच पावसाला पुन्हा सुरुवात झाली होती. त्यामुळे सामना सुरू होण्यास उशीर झाला. दुसऱ्या सत्राची सुरुवात होताच भारतीय कर्णधाराने आर अश्विनकडे चेंडू सोपवला. त्याचा परिणामही लगेचच दिसून आला. लंच ब्रेकनंतर आपले दुसरे षटक टाकताना अश्विन बांगलादेशचा कर्णधार नजमुल हसन शांतोला (31 धावा) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अशा प्रकारे फिरकीपटू अन्नाने नवा इतिहास रचला. शांतो बाद होताच अश्विन आशियातील मैदानांवर सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला.
612 : मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)
420 : आर अश्विन* (भारत)
419 : अनिल कुंबळे (भारत)
354 : रंगना हेरथ (श्रीलंका)
300 : हरभजन सिंग (भारत)
अश्विनने शांतोला एलबीडब्ल्यू आऊट केले आणि यासह तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक एलबीडब्ल्यू विकेट घेणारा 5वा गोलंदाज ठरला. त्याने ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्लेन मॅकग्राला मागे टाकले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जास्त LBW विकेट घेण्याचा विक्रम अनिल कुंबळे यांच्या नावावर आहे.
156 : अनिल कुंबळे (भारत)
149 - मुरलीधरन (श्रीलंका)
138 : शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया)
119 : वसीम अक्रम (पाकिस्तान)
114 : आर अश्विन (भारत)
113 : ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया)
112 : कपिल देव (भारत)
अश्विन हा आशिया खंडात सर्वाधिक कसोटी बळी घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. त्याने अनिल कुंबळेचा 82 सामन्यांच्या 144 डावात 419 बळींचा विक्रम मोडला. शुक्रवार खेळ थांबला तेव्हा अश्विनने 97 सामन्यांच्या 171व्या डावात 420 विकेट्स पर्यंत मजल मारली आहे. या काळात अश्विनने 33 डावात पाच विकेट्सही घेतल्या आहेत.