नवी दिल्ली; वृत्तसंस्था : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने शानदार स्टाईलमध्ये वन-डे वर्ल्डकपची सुरुवात केली आहे. पहिल्याच लढतीत पाच वेळा वर्ल्डकप जिंकणार्या ऑस्ट्रेलियाचा 6 विकेटनी पराभव केला. आता भारताची लढत तुलनेत कमकुवत असलेल्या अफगाणिस्तानविरुद्ध आज 11 ऑक्टोबर रोजी होत आहे. ही लढत दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होईल. या सामन्यात मोठा विजय मिळवून भारत आपली धावगती भक्कम करण्याच्या प्रयत्नात असेल. (IND Vs AFG ICC ODI World Cup)
अफगाणिस्तानला पहिल्या लढतीत बांगला देशकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता टीम इंडिया विजयाची लय कायम ठेवण्यास उत्सुक असेल, तर अफगाणिस्तानचा संघ भारताविरुद्धच्या पहिल्या विजयासाठी प्रयत्न करेल.
दिल्लीच्या मैदानावर या वर्ल्डकपमधील ही दुसरी लढत आहे. याआधी श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिली लढत झाली होती. त्या सामन्यात विक्रमी धावसंख्या उभारली गेली होती. दोन्ही संघांनी मिळून 754 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 428 धावांचा डोंगर उभा केला. उत्तरादाखल श्रीलंकेने 326 धावा केल्या होत्या. (IND Vs AFG ICC ODI World Cup)
शुभमन गिल या सामन्यात खेळणार नाही, हे आधीच स्पष्ट झाले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ईशान किशन शुन्यावर बाद झाला असला, तरी तोच रोहितसोबत सलामीला येईल. शुभमनच्या जागेवर यशस्वी जैस्वालला संधी मिळणार, असे वृत्त काही ठिकाणी प्रसिद्ध झाले आहे. परंतु, अशा शक्यता फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी फेटाळून लावली आहे.
या सामन्यावेळी पावसाची कोणतीही शक्यता नाही. दिल्लीमध्ये सध्या दिवसा उन्हाळा असल्यासारखे कडक ऊन जाणवत आहे. दिवसभरात कमाल तापमान 36 अंश सेल्सिअसपर्यंत राहील, तर रात्री ते 30 अंश सेल्सिअसपर्यंत कमी येईल. सायंकाळनंतर गारवा जाणवण्याची शक्यता आहे. शिवाय, सामन्यावेळी दव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. त्यामुळे येथे दुसर्या डावात फलंदाजी करणे सोपे आहे. नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेईल.
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवरील खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. सीमारेषा जवळ असल्याने फलंदाजांना अधिक फायदा मिळतो. याशिवाय ही खेळपट्टी संथ असते. ज्यामुळे फिरकीपटूंना अधिक मदत मिळते. या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 230, तर दुसर्या डावातील सरासरी 207 इतकी आहे. या मैदानावर झालेल्या 29 वन-डे मॅचमध्ये 14 वेळा प्रथम फलंदाजी करणार्या संघाने, तर 14 वेळा दुसर्यांदा फलंदाजी करणार्या संघाने विजय मिळवला आहे. (IND Vs AFG ICC ODI World Cup)