

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) ताज्या टी-२० क्रमवारीत भारतीय फलंदाजांचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्माने आपले पहिले स्थान टिकवून ठेवले आहे. मात्र, त्याचे रेटिंमध्ये नुकसान झाले आहे. दुसरीकडे कर्णधार सूर्यकुमार यादव आणि यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन यांच्या क्रमवारीत लक्षणीय सुधारणा झाली आहे.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी जाहीर झालेल्या या क्रमवारीत अभिषेक शर्माने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. अभिषेकच्या रेटिंगमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत (९२९ वरून ९१७) किंचित घट झाली असली, तरी तो अजूनही पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे.
दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडच्या फिल सॉल्टची रेटिंग ८३४ असून, अभिषेक आणि त्याच्यात मोठे अंतर आहे. यामुळे आगामी टी-२० विश्वचषकात अभिषेक शर्मा जगातील 'नंबर वन' फलंदाज म्हणून मैदानात उतरेल, हे आता निश्चित झाले आहे.
गेल्या काही काळापासून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या तिलक वर्माला क्रमवारीत फटका बसला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत खेळता न आल्यामुळे तो आता चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. दुसरीकडे, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचा फॉर्म परतला असून त्याने एका स्थानाची झेप घेत सहावे स्थान पटकावले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या धडाकेबाज खेळीमुळे त्याचे रेटिंग ७२८ झाले असून, तो लवकरच टॉप-५ मध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
या क्रमवारीत सर्वात मोठी सुधारणा इशान किशनच्या बाबतीत पाहायला मिळाली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यात ठोकलेल्या झंझावाती शतकाचा इशानला मोठा फायदा झाला आहे. त्याने थेट ३२ स्थानांची मोठी उडी घेत ३२ वे स्थान गाठले आहे. प्रदीर्घ काळानंतर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या इशानने मिळालेल्या संधीचे सोने करत आपले ५८४ रेटिंग गुण नोंदवले आहेत.