

पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धेला आता जेमतेम 40 दिवसांचा कालावधी बाकी असला तरी पाकिस्तानमधील तिन्ही ठिकाणी स्टेडियम्स अद्याप तयार नाहीत. यामुळे, आयसीसीला ही पूर्ण स्पर्धाच दुबईत स्थलांतरित करावी लागेल का, असा प्रश्न उभा ठाकला आहे. पूर्वनियोजित रूपरेषेप्रमाणे दि. 19 फेब्रुवारीपासून खेळवल्या जाणार्या या स्पर्धेतील पाकिस्तानातील सामने कराची, लाहोर व रावळपिंडी येथे होणे अपेक्षित आहे. मात्र, या तिन्ही ठिकाणी तयारी अद्याप सुरूच असल्याचे चित्र आहे. पुढील आठवड्यात याबाबतचा निर्णय येऊ शकतो, असेही सूत्रांनी यावेळी सांगितले आहे.
यापूर्वी ठरलेल्या रूपरेषेप्रमाणे 12 फेब्रुवारीपर्यंत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला या स्टेडियम्सचा ताबा आयसीसीकडे सोपवणे आवश्यक आहे. मात्र, एकूण कामाचा वेग पाहता ते शक्य होईल, असे दिसत नाही. गतवर्षी ऑगस्टमध्ये या स्टेडियमच्या डागडुजीचे व नूतनीकरणाचे काम सुरू केले गेले आहे; परंतु त्यांचा कामाचा वेग पाहता ते शक्य दिसत नाही. मागच्यावर्षी ऑगस्ट महिन्यात या स्टेडियम्सचे काम हाती घेतले होते आणि 31 डिसेंबरपर्यंत ते पूर्ण होणे अपेक्षित होते.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यास एक महिना उरला आहे; परंतु पाकिस्तानमध्ये स्टेडियममधील स्थिती चिंताजनक आहे. कराचीतील नॅशनल स्टेडियम, लाहोरमधील गद्दाफी स्टेडियम आणि रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम येथे बांधकाम आणि नूतनीकरणाचे काम अजूनही सुरू आहे आणि ही तिन्ही ठिकाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे सोपवण्याची वेळ आली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सुरू झालेले स्टेडियमचे काम 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार होते. पण, ते पूर्ण होण्याच्या जवळपासही नाही.
स्टेडियम्सच्या अपूर्ण तयारीचे हे चित्र पाहता, आयसीसीने स्पर्धा अंतिम क्षणी पूर्णपणे दुबईत हलवण्याची चाचपणी सुरू केली आहे. ज्याप्रमाणे गेल्या वर्षी यूएसएमध्ये होत असलेल्या टी-20 विश्वचषकादरम्यान गोंधळाची स्थिती होती. त्याचप्रमाणे चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीची पाकिस्तानातील स्थिती ही अगदी तशीच आहे. तिन्ही स्टेडियम अद्याप पूर्ण झालेली नाहीत आणि हे नूतनीकरण नाही तर स्टेडियमचे मूळ बांधकाम चालू आहे. आसनाच्या जागा, फ्लडलाईटस्, सुविधा आणि अगदी आऊटफिल्ड आणि खेळपट्टीसह बरीच तयारी बाकी आहे. यापूर्वी अमेरिकेत पार पडलेल्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेतही आयसीसीला अशा समस्येचा सामना करावा लागला होता. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सहभागी संघ या महिन्याच्या अखेरीस पाकिस्तानमध्ये दाखल होतील. पण, स्टेडियमची सध्याची स्थिती पाहता बॅक अप प्लान म्हणून दुबईचा विचार संपूर्ण स्पर्धेसाठी केला जाऊ शकतो.
पाकिस्तानने या स्पर्धेच्या आयोजनाबाबत चर्चा सुरू असताना हायब्रीड मॉडेलला पूर्णपणे विरोध दर्शवला होता. अंतिमत: त्यांनी यात कशीबशी तयारी दर्शवली. पण, इतके होत असताना पाकिस्तानात या स्पर्धेच्या तयारीतच मोठी त्रुटी असल्याचे आता आढळून आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाहोर आणि कराची येथे मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू आहे. ड्रेसिंग रूम, हॉस्पिटॅलिटी बॉक्स अद्याप अंतिम टप्प्यात आलेले नाहीत. येथे कुंपण घालण्याचे काम, फ्लडलाइर्टस् आणि आसन व्यवस्थेचे कामही झालेले नाही.बांधकाम आणि फिनिशिंगचे काम जलद गतीने होण्यासाठी हवामान योग्य नाही. गद्दाफी येथे प्लास्टरचे कामही अद्याप पूर्ण झालेले नाही.
चॅम्पियन्स चषक स्पर्धेसाठी तयारीत खंड पडू नये, यासाठी पाकिस्तानने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले असून याचाच एक भाग म्हणून त्यांनी तिरंगी मालिकेतील मुलतान येथील सामने लाहोर व कराचीत हलवण्याचा निर्णय घेतला आहे. यजमान पाकिस्तानसह न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिकेचा या तिरंगी मालिकेत समावेश आहे. चार सामन्यांचा समावेश असलेल्या या तिरंगी मालिकेतील सामने मुलतान येथे खेळवले जाणार होते. सध्याच्या रूपरेषेनुसार, चॅम्पियन्स चषकातील 10 ते 15 सामने लाहोर, कराची व रावळपिंडी येथे होतील तर भारताचे सामने दुबईत होतील, असे आयोजन करण्यात आले आहे.