

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईचा फिरकी गोलंदाज अष्टपैलू तनुष कोटियनचा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, कोटियन मंगळवारी ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. तनुष 26 डिसेंबर रोजी चौथ्या (मेलबर्न) कसोटीसाठी संघात सामील होईल, अशी चर्चा आहे.
26 वर्षीय कोटियन सध्या अहमदाबादमध्ये मुंबईकडून विजय हजारे ट्रॉफी खेळत आहे. तो संघात नुकताच निवृत्त झालेल्या रविचंद्रन अश्विनची जागा घेईल. कोटियन पूर्वी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारत अ संघाचा भाग होता.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील तीन सामने खेळले गेले आहेत. दोन्ही संघांनी 1-1 सामना जिंकला आहे. तर तिसरा सामना अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे सध्या ही मालिका बरोबरीत आहे. दरम्यान, तिस-या कसोटीनंतर टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू आर अश्विनने अचानक निवृत्ती जाहीर केली. टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. अश्विनसारख्या महान खेळाडूची टीम इंडियाला नेहमीच उणीव भासेल.
मुंबईच्या तनुष कोटियनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 33 सामन्यांत 101 बळी घेतले आहेत. कोटियनने फलंदाजीत 2 शतके आणि 13 अर्धशतकांसह 1525 धावा केल्या आहेत. तनुषच्या नावावर 20 लिस्ट ए सामन्यात 20 बळी आणि 90 धावा आहेत. 33 टी-20 मध्ये 6.39 च्या इकॉनॉमीने गोलंदाजी करताना त्याने 33 विकेट घेतल्या आणि 87 धावा केल्या.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये सोमवारी हैदराबादविरुद्ध त्याने 39 धावा केल्या. तसेच 2 बळी घेतले. इंडिया-अ कडून खेळताना त्याने मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलिया-अ विरुद्ध 44 धावा केल्या होत्या.
इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या मेगा लिलावात तनुषला कोणताही खरेदीदार मिळाला नाही. 2024 मध्ये, कोटियनने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना आयपीएलमध्ये पदार्पण केले. मात्र, त्याला एकच सामना खेळण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये त्याने 24 धावा केल्या. या सामन्यात त्याने गोलंदाजी केली नाही.
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर आणि तनुष कोटियन.