

मुंबई : भारतीय संघाच्या अलीकडील निराशाजनक कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी आणि भविष्यातील रणनीती आखण्यासाठी ‘बीसीसीआय’ने गुरुवारी (दि. ३) मुंबईतील मुख्यालयात एका उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीसाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, मुख्य निवडकर्ते अजित आगरकर आणि सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांना पाचारण केले गेले असून, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनाही हजर राहण्याची सूचना केली गेली आहे.
केवळ ब्रिटन दौराच नव्हे, तर झिम्बाब्वे आणि श्रीलंका दौऱ्यांतील चढ-उतारांवरही या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे. आयर्लंड दौर्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला ०-२ फरकाने धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. आयरिश भूमीतील हा भारताचा पहिलाच मालिका पराभव ठरला. त्यानंतर ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत इंग्लंडनेदेखील भारताचा ४-० असा धोबीपछाड केला. या अनुषंगाने ‘बीसीसीआय’ने याची गांभीर्याने दखल घेतली. त्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता, हे देखील येथे लक्षवेधी आहे.
त्यानंतर शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली ३ सामन्यांच्या वन-डे मालिकेत भारताने विजयी सलामी दिली खरी; पण ती मालिकाही संघाला १-२ फरकाने गमवावी लागली होती. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील अनपेक्षित पराभव, फलंदाजीतील सातत्याचा अभाव आणि लॉर्डस्वरील वन-डे सामन्यांतील चुका यावर संघ व्यवस्थापनाला यावेळी जाब विचारला जाण्याची शक्यता आहे.
या आढावा बैठकीत पुढील वर्षी होणार्या वन-डे विश्वचषक स्पर्धेच्या तयारीबाबतही विचारविनिमय केला जाणार आहे. पूर्वनियोजित रूपरेषेनुसार, ही वन-डे विश्वचषक स्पर्धा द. आफ्रिका, झिम्बाब्बे व नामिबिया येथे ४ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत खेळवली जाईल.