

पुढारी ऑनलाईन डेस्क : Australia A beat India A : भारतीय संघाचा फॉर्म चांगला नाही. अलीकडेच न्यूझीलंडने 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा 3-0 ने पराभव केला आहे. या पराभवामुळे भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत फटका बसला. टीम इंडियाला गुणतालिकेत अव्वल स्थान गमवावे लागले. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर टीम इंडियाला आता 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळायची आहे. या ट्रॉफी अंतर्गत 5 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. मालिका सुरू होण्यास अजून काही कालावधी बाकी असला तरी भारतीय अ संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
वास्तविक, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (एमसीजी) येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या अनौपचारिक कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया अ संघाने भारत अ संघाचा 6 गडी राखून पराभव केला. भारताचा पहिला डाव 161 धावांवर आटोपला. ध्रुव जुरेल वगळता इतर सर्व फलंदाजांनी निराशा केली. जुरेलने 80 धावांची खेळी खेळली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या अ संघाने 223 धावा केल्या. दुसऱ्या डावात भारतीय संघाने थोडी चांगली कामगिरी केली पण ती अपुरी ठरली. यावेळीही जुरेलने सर्वाधिक 68 धावा केल्या. भारताने दुसऱ्या डावात 229 धावा करत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 168 धावांचे लक्ष्य दिले. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरुवातीला गडगडला पण नंतर सॅम कोन्स्टासच्या नाबाद 73 आणि ब्यू वेबस्टरच्या नाबाद 46 धावांच्या जोरावर सहा विकेट्स शिल्लक राखून लक्ष्य गाठले.
याआधी ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात भारताचा 7 विकेट्सने पराभव केला होता. अशा प्रकारे यजमानांनी 2 अनौपचारिक सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा 0-2 असा व्हाईटवॉश केला. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारत अ संघाच्या या पराभवामुळे टीम इंडिया तणावात आहे. बीजीटीच्या तयारी लक्षात घेऊन केएल राहुल आणि ध्रुव जुरेल यांना ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात आले होते. जेणेकरून ते दोघेही भारत अ संघातून खेळतील आणि तयारी करू शकतील. पण राहुलने दोन्ही डावात निराशा केली. मात्र जुरेलने मिळालेल्या संधीचे सोने करून दोन्ही डावात शानदार अर्धशतके झळकावली.