

निशिन, जपान : गतविजेत्या भारतीय महिला संघाने शुक्रवारी आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेट स्पर्धेच्या चौथ्या उपांत्यपूर्व फेरीत यजमान जपानचा आठ गडी राखून पराभव केला. भारताने ५८ धावांचे लक्ष्य अवघ्या पाच षटकांत पूर्ण करत सहजपणे उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. आता २० सप्टेंबर रोजी अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताचा सामना बांगलादेशशी होईल.
दरम्यान, जपान हा सामना हरला असला तरी पूर्ण २० षटके खेळून काढण्याचा त्यांचा प्रयत्न, विकेट्समधील धावण्याची शैली आणि क्षेत्ररक्षणातील मेहनत ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली. मात्र, चांगल्या सुरुवातीनंतरही जपानचा डाव १९.५ षटकांत ५७ धावांवर कोलमडला, त्यामुळे भारतासमोर अगदी सोपे लक्ष्य उरले.
प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताने अनुकूल खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेतला, त्यामुळे जपानच्या फलंदाजांना फटके मारणे कठीण झाले. श्री चरणीने चार बळी घेत पुन्हा एकदा शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले. तिने सातव्या षटकात सलग चेंडूंवर दोन विकेट्स घेत सलामीवीर हारुना इवासाकी (१० धावा) आणि कर्णधार माई यानागिडा (शून्य) यांना बाद केले, पण तिची हॅटट्रिक थोडक्यात हुकली.
इवासाकी आणि आयाका काटो-स्टॅफर्ड यांनी पहिल्या विकेटसाठी २४ धावांची भागीदारी केली, पण ही जोडी फुटल्यानंतर जपानला मोठी भागीदारी करता आली नाही. जपानकडून काटो-स्टॅफर्डने ४७ चेंडूंत सर्वाधिक २५ धावा केल्या, तर इवासाकीने २२ चेंडूंत १० धावा केल्या. जपानने आपल्या शेवटच्या आठ विकेट्स अवघ्या ३३ धावांत गमावल्या.श्री चरणीने आपल्या चार षटकांत १० धावा देत ४ बळी टिपले, तर शेफाली वर्माने १३ धावांत २ आणि दिप्ती शर्माने १४ धावांत १ बळी टिपला.दुखापतीतून सावरत तब्बल तीन महिन्यांनंतर पुनरागमन करणाऱ्या श्रेयंका पाटीलने ३.५ षटकांत ८ धावा देत १ गडी बाद केला.
५८ धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाने अवघ्या पाच षटकांत २ बाद ५९ धावा करत सहज विजय मिळवला.श फाली वर्माने अवघ्या १५ चेंडूंत ४ चौकारांसह नाबाद ४० धावांची विस्फोटक खेळी केली. भारताने गुनलन कमलिती (०) आणि भारती फुलमळी (६ धावा) यांचे बळी लवकर गमावले, पण जपानला या सुरुवातीच्या यशाचा फायदा उठवता आला नाही. त्यानंतर ऋचा घोषने शेफालीची साथ देत ६ चेंडूंत नाबाद १२ धावा करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले.
विजयासाठी केवळ एका धावेची गरज असताना, शफाली वर्माने शिमाको काटोच्या गोलंदाजीवर लाँग-ऑनच्या दिशेने खणखणीत षटकार ठोकत सामना दणदणीत विजयाची नोंद करत संपवला. अशा प्रकारे भारताने ९० चेंडू शिल्लक ठेवून उपांत्यपूर्व सामना जिंकला आणि महिला क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले.
उपांत्य फेरीचे चित्र आता स्पष्ट झाले असून, पाकिस्तानचा सामना श्रीलंकेशी तर भारताचा सामना बांगला देशशी होईल. दोन्ही उपांत्य सामने रविवारी खेळवले जाणार आहेत.