

India vs Pakistan Asia Cup 2025 : भारताविरुद्धच्या सामन्यात मैदानावर चिथावणीखोर वर्तन करणार्या पाकिस्तानच्या क्रिकेटपटू साहिबजादा फरहान आणि हारिस रौफविरोधात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) तक्रार केली आहे. या दोघांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवच्या वर्तनाबद्दल आयसीसीकडे आक्षेप नोंदवला आहे.
सुपर-4 सामन्यात अर्धशतक पूर्ण केल्यानंतर पाकिस्तानी फलंदाज साहिबजादा फरहान यांनी गन सेलिब्रेशन केले होते. वेगवान गोलंदाज हारिस रौफ यांनी संजू सॅमसनला बाद केल्यानंतर आक्रमक हावभाव केले. नंतर सीमारेषेवर असताना त्याने भारतीय प्रेक्षकांकडे पाहत आक्षेपार्ह हावभावही केले होते. त्याने आपल्या हावभावातून सहा भारतीय लढाऊ विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा दावा केला होता. या वर्तनाची बीसीसीआयने गंभीर दखल घेतली आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, ही तक्रार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याकडे दाखल करण्यात आली आहे. भारतीय संघाने या दोन्ही खेळाडूंविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. कारण मैदानावर त्यांचे वर्तन मर्यादेबाहेरचे होते.
बीसीसीआयने तक्रार बुधवारी ईमेलद्वारे पाठवली. रौफ आणि फरहान यांनी आरोपांचे लेखी खंडन केले आहे. आता त्यांना आयसीसीच्या एलिट पॅनेलचे रेफरी रिची रिचर्डसन यांच्यासमोर सुनावणीसाठी हजर राहावे लागणार आहे. या आरोपांनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही पलटवार करत भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवच्या विरोधात औपचारिक तक्रार दाखल केली आहे. पीसीबीचा आरोप आहे की, सूर्याचे वर्तन खेळभावनेविरोधात होते.
विशेष म्हणजे, यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवविरुद्ध आयसीसीकडे दोन तक्रारी दाखल केल्या होत्या. १४ सप्टेंबरच्या सामन्यानंतर पहलगाम घटनेवर सूर्यकुमार यादव यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर पीसीबीने आक्षेप घेतला आहे. त्याने क्रिकेट सामन्याला राजकीय स्वरूप दिले, असा दावा पीसीबीने केला आहे.
T-20 आशिया चषकातील पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला होता की, "आम्ही पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहोत. आम्ही त्यांच्यासोबत एकजुटीने उभे आहोत. आमचा विजय आपल्या सर्व सशस्त्र दलांना समर्पित करू इच्छितो. त्यांनी खूप धैर्य दाखवले. ते आपल्याला सर्वांना प्रेरणा देत राहतील. आम्ही मैदानावर सर्वोत्कृष्ट कामगिरी करत त्यांचा आनंद वर्धित करू."