

मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू रोहित शर्माने दुखापतीतून सावरल्यानंतर मैदानात दिमाखदार पुनरागमन केले. लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात त्याने अवघ्या ४४ चेंडूत ८४ धावांची तुफानी खेळी साकारली.
IPL 2026 Rohit Sharma vs R Ashwin
मुंबई : भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या तो क्रिकेट विश्लेषक आणि समालोचक म्हणून कार्यरत आहे. याशिवाय अश्विन त्याच्या यूट्यूब चॅनेलवर सामन्याचे विश्लेषण करणारे व्हिडिओ देखील पोस्ट करत असतो. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या आयपीएल २०२६ च्या सामन्यावर अश्विनने भाष्य न केल्याने चाहते काहीसे नाराज झाले होते. या सामन्यात रोहित शर्माने दुखापतीनंतर परतत ४४ चेंडूत ८४ धावा केल्या होत्या.
रोहितच्या खेळीकडे दुर्लक्ष का केले? असा प्रश्न विचारला असता अश्विनने मजेशीर उत्तर दिले. एका अँकरने अश्विनला मिश्किलपणे विचारले की, "चाहते म्हणत आहेत की तुम्ही आरसीबी आणि विराट कोहलीच्या खेळाचे विश्लेषण करता, पण रोहितने इतक्या काळानंतर एवढी चांगली खेळी केली तरी तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले. तुमच्यात आणि रोहितमध्ये काही बिनसलंय का?"
या प्रश्नावर अश्विन हसत म्हणाला, "तुम्ही काहीही बोलताय. जर माझे कोणाशी भांडण झाले असते, तर मी ते मनात ठेवले नसते. कृपया मला समजून घ्या आणि माझ्याबद्दल थोडी सहानुभूती ठेवा. मी सलग दोन दिवस समालोचन केले, त्यानंतर प्रवास करून घरी पोहोचलो आणि रात्री झोपलो होतो, त्यामुळे व्हिडिओ करू शकलो नाही."
रोहितच्या खेळीचे कौतुक करताना अश्विन म्हणाला, "रोहित शर्माने अतिशय सुंदर खेळी केली. त्याने आवेश खानला एक्स्ट्रा कव्हरवरून जो षटकार मारला, तो शॉट लूपवर लावून १००० वेळा पाहण्यासारखा होता. काय शॉट होता तो! त्याने मनिमारन सिद्धार्थलाही गोलंदाजाच्या डोक्यावरून षटकार मारला; पण या आयपीएलमध्ये एलएसजी आणि एमआयसाठी आता फार काही उरलेले नाही. मुंबईला आता कोणासमोर नाही तर स्वतःलाच सिद्ध करायचे आहे. लखनौविरुद्धही त्यांची गोलंदाजी अडचणीत दिसली, त्यामुळे इथून पुढे ते कशी कामगिरी करतात हे पाहावे लागेल."
रोहित शर्मा आणि रायन रिकलटन यांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने सोमवारी झालेल्या हाय-स्कोअरिंग सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा सहा गडी राखून पराभव केला. रोहितने ४४ चेंडूत ८४ धावा केल्या, तर रिकलटनने ३२ चेंडूत ८३ धावा ठोकल्या. या दोघांनी १४३ धावांची सलामीची भागीदारी करत लखनौचे २२९ धावांचे लक्ष्य सोपे केले. मुंबईने १८.४ षटकांत हे आव्हान पूर्ण केले. १० सामन्यांमधील मुंबईचा हा तिसरा विजय असून त्यांचे आता ६ गुण झाले आहेत. दुसरीकडे, लखनौचा संघ ९ सामन्यांत केवळ ४ गुणांसह तळाला आहे. दरम्यान, हे दोन्ही संघ आयपीएल २०२६ च्या प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडले आहेत.