

RCB vs MI match controversy
मुंबई : मैदानी पंचांच्या निर्णयाला आक्रमकपणे आव्हान दिल्याबद्दल आणि चौथ्या पंचांशी हुज्जत घातल्याबद्दल रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) चे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) त्यांना दोषी ठरवत दंड ठोठावला आहे. मुंबई इंडियन्स (MI) विरुद्धच्या सामन्यादरम्यान फ्लॉवर आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.३ चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळले आहे. या गुन्ह्यासाठी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने त्यांच्या मॅच फीच्या १५% दंड आकारला आहे.
१८ व्या षटकात तिसऱ्या पंचांच्या एका वादग्रस्त निर्णयामुळे RCB ला चौकार नाकारण्यात आला. या वेळी फ्लॉवर यांनी दिनेश कार्तिकसह चौथ्या पंचांकडे जाऊन हा निर्णय चुकीचा असल्याचा युक्तिवाद केला. कार्तिकवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसली तरी, या संवादादरम्यान फ्लॉवर यांनी आपली मर्यादा ओलांडल्याचे लीगने स्पष्ट केले आहे.
आयपीएलने आपल्या अधिकृत पत्रकात म्हटले आहे की, "रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांना खेळाडू आणि संघ अधिकाऱ्यांच्या आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल १ चे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्या मॅच फीच्या १५% दंड ठोठावण्यात आला आहे. फ्लॉवर यांनी कलम २.३ चे उल्लंघन केल्याचे मान्य केले आहे. 'सामन्यादरम्यान तोंडी शिवीगाळ' करण्याशी संबंधित आहे. १७.२ षटकात फ्लॉवर चौथ्या पंचांशी आक्रमकपणे बोलले.फ्लॉवर यांनी आपला गुन्हा कबूल केला असून मॅच रेफरी अमित शर्मा यांनी दिलेली शिक्षा मान्य केली आहे.
डगआऊटमधील या वादाचा परिणाम RCB च्या निकालावर झाला नाही. संघाने सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर दोन गडी राखून थरारक विजय मिळवला. या विजयासह RCB ने हंगामातील आपला सातवा विजय नोंदवत गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. अष्टपैलू कामगिरीसाठी भुवनेश्वर कुमारला 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून गौरवण्यात आले. सुरुवातीला चार बळी घेतल्यानंतर, अनुभवी वेगवान गोलंदाज बॅटनेही नायक ठरला. शेवटच्या तीन चेंडूंवर ९ धावांची गरज असताना, भुवनेश्वर कुमारने राज अंगद बावाला षटकार खेचत RCB च्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
"शेवटच्या षटकातील तो षटकार नक्कीच माझ्या लक्षात राहील. मी अनेकदा गोलंदाजी केली आहे आणि बळी घेतले आहेत, पण त्या षटकाराचा मी सर्वाधिक आनंद लुटला," अशा शब्दांमध्ये भुवनेश्वर कुमारने आपल्या कामगिरीवर आनंद व्यक्त केला. भुवनेश्वर यंदाच्या आयपीएलमध्ये २१ बळींसह पर्पल कॅप मानकरी आहे. त्याच्या आयपीएल कारकिर्दीत एकाच हंगामात २० बळींचा टप्पा ओलांडण्याची ही चौथी वेळ आहे.