’टी-२० कर्णधारपद सोडण्याचा विराटवर दबाव टाकला नव्हता’

’टी-२० कर्णधारपद सोडण्याचा विराटवर दबाव टाकला नव्हता’
Published on
Updated on

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : गेल्या काही दिवसांपासून भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याचे कर्णधारपद यावरून बरीच चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी विराट कोहलीने एका मुलाखतीमध्ये कर्णधारपदावरून बीसीसीआयसोबत झालेल्या चर्चेविषयी गंभीर खुलासेवजा आरोप केले होते. यावरून बीसीसीआय आणि विराट कोहली यांच्यामध्ये विसंवाद असल्याचे उघड झाले होते. या सर्व प्रकरणावर आता प्रत्यक्ष निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी खुलासा केला आहे. टी-20 चे कर्णधारपद सोडण्यासाठी विराटवर दबाव टाकला नव्हता, असे त्यांनी म्हटले आहे. परंतु, यातून हा वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.

'तो' निर्णय निवड समितीचा होता!

'एकदिवसीय संघासाठीही नव्या कर्णधाराची निवड करण्याचा निर्णय निवड समितीचा होता,' असे चेतन शर्मा म्हणाले. 'आमचा निर्णय झाल्यानंतर मी लगेच विराट कोहलीला फोन केला. ती कसोटी संघाच्या निवडीसाठीची बैठक होती. आम्हाला त्या मीटिंगमध्ये विराटला याबद्दल सांगायचे नव्हते. म्हणून मीटिंग संपल्यानंतर मी विराटला फोन करून सांगितले की निवड समितीला वाटते की, पांढर्‍या चेंडूच्या दोन्ही प्रकारांसाठी एकच कर्णधार असावा. आमचे फार चांगले संभाषण झाले,' असे चेतन शर्मा म्हणाले.

भारतीय क्रिकेटसाठी तरी…

जो कुणी त्या मीटिंगसाठी उपस्थित होता, त्या सर्वांनी विराटला टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करायला सांगितले. वर्ल्डकप जवळ येत होता. त्यामुळे आम्ही विराटला म्हणालो, किमान भारतीय क्रिकेटसाठी तरी निर्णयाचा पुनर्विचार कर. ही चर्चा वर्ल्डकपनंतर व्हायला हवी होती; पण आम्ही विराट कोहली आणि त्याच्या निर्णयाचा सन्मान करतो,' असे शर्मा म्हणाले.

कोहलीचा दावा खोटा?

एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेताना आपल्याशी चर्चा झाली नसल्याचा दावा विराट कोहलीने केला होता. मात्र, चेतन शर्मा यांनी तो दावा खोडून काढला आहे. 'हा पूर्णपणे विराट कोहलीचा निर्णय होता. कुणीही विराटवर टी-20 चे कर्णधारपद सोडण्यासाठी दबाव टाकला नव्हता. एकदा त्याने ते सोडल्यावर निवड समितीला विचार करावा लागला. कारण, आम्हाला वाटत होते की एकदिवसीय आणि टी-20साठी एकच कर्णधार असावा. कारण, त्यामुळे निवड समितीला इतर गोष्टींचे नियोजन करणे सोपे होते. आम्ही त्याला याबाबत माहितीदेखील दिली होती,' असे चेतन शर्मा यांनी सांगितले.

…म्हणून कर्णधारपद काढून घेण्यात आले

दरम्यान, चेतन शर्मा यांनी विराट कोहलीचे कौतुक केले आहे. 'विराट हा भारतीय क्रिकेटसाठी फार महत्त्वाचा खेळाडू आहे. अख्खा संघ त्याच्याभोवती तयार होत आहे. त्यामुळे आमची इच्छा आहे की त्याने भारतासाठी खेळत राहावे आणि धावा करत राहावे, आम्हाला फक्त टी-20 आणि एकदिवसीय संघासाठी एकच कर्णधार हवा होता. त्यामुळे त्याच्याकडून वन-डे क्रिकेटचे कर्णधारपद काढून घेण्यात आले. हा एक कठीण निर्णय होता; पण निवड समितीला असे कठीण निर्णय घ्यावे लागतात,' असे चेतन शर्मा म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news