![सूर्यकुमारचा झंझावात, विराटच्या ‘त्या’ विक्रमाशी केवळ ६४ व्या सामन्यातच बरोबरी!](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F09%2Fsuryakumar-yadav.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियातील स्टार फलंदाज सूर्यकुमारची बॅट तळपली. त्याने २८ चेंडूंत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५३ धावांची खेळी केली. या खेळीत त्याच्या अप्रतिम फटकेबाजीने क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. त्याला सामनावीर म्हणून गौरवविण्यात आले. या कामगिरीने त्याने विराट कोहलीच्या एका विक्रमाची बरोबरीही केली.
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात एकीकडे भारतीय फलंदाजांनी बचावात्मक पवित्रा घेतला. यावेळी सूर्यकुमारनेआपल्या नैसर्गिक खेळ केला. त्याच्या दमदार ५३ धावांच्या रोळीने भारताने १८१ धावापर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ २० षटकांमध्ये १३४ धावांवर गुंडाळला गेला.
सूर्यकुमारने गुरुवारी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील ६४ वा सामना खेळला. या सामन्यात तो सामनावीर ठरला. त्याचा आजवरचा हा १५ वा फ्लेऑफ द मॅचचा पुरस्कार ठरला. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक खेळाडूचा पुरस्कार जिंकण्यात विराट कोहलीच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली. विराट हा १५ वेळा सामनावीर ठरला आहे. मात्र, विराट यासाठी 113 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे तर सूर्यकुमारने केवळ ६४ सामन्यांमध्येच ही कामगिरी केली आहे.
विराट कोहलीला २०२२ मध्ये T-20 विश्वचषक स्पर्धेत सामनावीर म्हणून घोषित केले होते. ६ नोव्हेंबर २०२२ रोजी बांगलादेश विरुद्धच्या T20 विश्वचषक सामन्यात त्याने नाबाद ६४ धावांची खेळी केली होती. 2022 च्या T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत त्याने इंग्लंडविरुद्ध 50 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने सहा डावांत एकही अर्धशतक झळकावलेले नाही. विराटच्या नावावर १२१ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४०६६ धावा आहेत. यामध्ये एक शतक आणि 37 अर्धशतकांचा समावेश आहे.
सूर्यकुमारने २०२२ टी-20 विश्वचषकापासून २४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामधील तीन सामन्यात त्याने शतकी खेळी केली आहे. २०२२ च्या टी२० विश्वचषकानंतर टी-२० फॉरमॅटमध्ये टीम इंडियासाठी सूर्यकुमार सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. कालावधीत त्याने 24 सामन्यांत ५१ च्या सरासरीने ९६९ धावा केल्या आहेत. या काळात त्याने तीन शतकांव्यतिरिक्त सात अर्धशतकेही झळकावली आहेत.नाबाद 112 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती.
यंदाच्या T 20 विश्वचषक स्पर्धेत विराटने चार डावात केवळ २९ धावा केल्या आहेत. यामध्ये 1, 4, 0 आणि 24 धावांचा समावेश आहे. भारताला सुपर-8 मधील आपला पुढचा सामना बांगलादेशविरुद्ध 22 जून रोजी अँटिग्वा येथे होणार आहे. यानंतर टीम इंडियाचा सामना 24 जून रोजी सेंट लुसिया येथे ऑस्ट्रेलियाशी सामना होणार आहे.