Virat Kohli : विराट कोहलीने प्रिती झिंटाची मागितली माफी, कारण… | पुढारी

Virat Kohli : विराट कोहलीने प्रिती झिंटाची मागितली माफी, कारण...

पुढारी ऑनलाई डेस्क : पंजाब किंग्ज (PBKS) प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा दुसरा संघ ठरला आहे. धर्मशाला येथे 9 मे रोजी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (RCB) संघाने पीबीकेएसचा 60 धावांनी पराभव करून स्पर्धेतील त्यांचे आव्हान संपुष्टात आणले.

हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर विराट कोहलीच्या (Virat Kohli) बॅटने कहर केला आणि पीबीकेएसच्या पराभवात महत्त्वाची भूमिका बजावली. विराटने 47 चेंडूत 92 धावा केल्या आणि यादरम्यान त्याने सात चौकार आणि सहा षटकार मारले. आयपीएलच्या 17 व्या हंगामात किंग कोहलीने धावांचा पाऊस पाडला आहे. त्याची ही कामगिरी अगामी टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी जमेची बाजू ठरेल.

दरम्यान, बॅटबरोबरच कोहलीने चपळाईने क्षेत्ररक्षण करून मैदाना गाजवले आहे. गुरुवारच्या सामन्यात त्याने पीबीकेएसचा स्टार फलंदाज शशांक सिंगला आपल्या अचूक थेट थ्रो धावबाद करून संपूर्ण सामन्यालाच वेगळे वळण दिले. ज्यामुळे आरसीबीच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.

कोहलीला त्याच्या शानदार फलंदाजी आणि भक्कम क्षेत्ररक्षणासाठी प्लेअर ऑफ द मॅच म्हणून निवडण्यात आले. हा पुरस्कार स्विकारण्यासाठी जेव्हा कोहली पुढे गेला तेव्हा पंजाब किंग्जची सहमालक प्रीती झिंटा तिथे उपस्थित होती. त्यावेळी कोहलीने ट्रॉफी घेण्यापूर्वी पंजाब किंग्जच्या पराभवाबद्दल प्रीती झिंटाला सॉरी म्हटल्याचं दिसले. दोघांमधील संभाषणाचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आयपीएलच्या (IPL 2024) प्लेऑफसाठी अद्याप कोणताही संघ पात्र ठरू शकलेला नाही. अशातच आरसीबीसाठी (RCB) प्लेऑफचे दरवाजे पूर्णपणे बंद झालेले नाहीत. हा संघ अजूनही प्लेऑफमध्ये पोहोचू शकतो, असे मानले जात आहे. पण त्यांना पुढचे सगळे सामने जिंकावे लागतील आणि दुस-या संघांच्या पराभवावर अवलंबून रहावे लागणार आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज हे दोन संघ शर्यतीतून बाहेर पडले आहेत. पंजाबला सलग दहाव्या हंगामात आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचता आलेले नाही.\

Back to top button