राजकोटमध्ये होणार फिरकीचा ‘खेला’ | पुढारी

राजकोटमध्ये होणार फिरकीचा ‘खेला’

राजकोट, वृत्तसंस्था : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर 15 फेब्रुवारीपासून खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी फिरकी गोलंदाजांना मदत करणारी खेळपट्टी तयार करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

भारतीय संघाचे फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत सध्या मिळालेल्या या अपडेटमुळे आनंदी होऊ शकतात. राजकोटमध्ये होणार्‍या तिसर्‍या कसोटी सामन्यासाठी संथ आणि फिरकीला पोषक खेळपट्टी मिळेल. भारतीय संघ व्यवस्थापन अशा खेळपट्टीसाठी अनुकूल आहे.

राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आतापर्यंत केवळ दोन कसोटी सामने खेळले गेले आहेत. 2016 मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटमध्ये खेळलेला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. 2018 मध्ये राजकोट येथे झालेल्या कसोटी सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 272 धावांनी पराभव केला होता. या सामन्यात विराट कोहली (139), पृथ्वी शॉ (134) आणि रवींद्र जडेजा (100*) यांनी टीम इंडियासाठी शतके झळकावली. भारताने पहिला डाव 649/9 धावांवर घोषित केला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला पहिल्या डावात 181 आणि दुसर्‍या डावात 196 धावांत गुंडाळले होते.

स्टेडियमचे उद्या नामकरण

सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन 14 फेब्रुवारी रोजी राजकोट येथे एका कार्यक्रमात रवींद्र जडेजा आणि चेतेश्वर पुजारा यांना भारतीय क्रिकेटमधील योगदानाबद्दल सन्मानित करेल. या सोहळ्यात राजकोटच्या स्टेडियमचे नामकरण अनुभवी प्रशासक निरंजन शहा यांच्या नावावर करण्यात येणार आहे.

Back to top button