अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धा : भारताला ऑस्ट्रेलियाचा बदला घेण्याची संधी; आज फायनल | पुढारी

अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धा : भारताला ऑस्ट्रेलियाचा बदला घेण्याची संधी; आज फायनल

बेनॉनी : वृत्तसंस्था : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुन्हा एकदा आज वर्ल्डकपची फायनल रंगणार आहे; परंतु हा सामना अंडर-१९ वर्ल्डकप संघांमध्ये होणार आहे. दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या या स्पर्धेत दोन्ही संघ तिसऱ्यांदा आमने-सामने येत आहेत. १९ नोव्हेंबर २०२३ रोजी ऑस्ट्रेलियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला हरवले होते. या पराभवाचा बदला घेण्याची संधी उदय सहारनच्या नेतृत्वाखालील युवा संघाला आली आहे.(India U19 vs Australia U19 Final)

१९ वर्षांखालील खेळाडूंची प्रतिभा पारखण्यासाठी होणाऱ्या या स्पर्धेचे भारताने सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद पटकावले असून ते आता विजेतेपदाचा ‘षटकार ठोकण्यास सज्ज झाले आहेत. भारत एकूण नवव्यांदा युवा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. या स्पर्धेत भारताने सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवले होते, तर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. दोन्ही संघ तिसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार आहेत. यापूर्वी २०१२ आणि २०१८ साली भारताने ऑस्ट्रेलियाला हरवले होते. (India U19 vs Australia U19 Final)

२०१६ नंतर भारताने प्रत्येक वेळी अंतिम फेरी गाठली आहे. यापैकी २०१८ आणि २०२२ साली विजेतेपद मिळवले आहे. २०१६ आणि २०२० मध्ये त्यांना उपविजेतेपद मिळाले होते. २००८ साली विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने ही स्पर्धा जिंकली, त्यानंतर या स्पर्धेची लोकप्रियता वाढली. (India U19 vs Australia U19 Final)

Back to top button