रोहित शर्माचे दडपण कमी करण्यासाठी नेतृत्वात बदल! | पुढारी

रोहित शर्माचे दडपण कमी करण्यासाठी नेतृत्वात बदल!

केपटाऊन, वृत्तसंस्था : रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय अवघड होता. मुंबई संघाला (Mumbai Indians) इतके देदीप्यमान यश मिळवून दिल्याने त्याचे नेतृत्व अर्थातच झळाळून निघाले होते. मात्र, यानंतरही त्याच्यावरील दडपण कमी करण्यासाठी आणि फलंदाज म्हणून नैसर्गिक खेळावर भर देता यावा, यासाठी नेतृत्व बदलाचा कठीण निर्णय घ्यावा लागला, असे स्पष्टीकरण त्याला मोकळेपणाने खेळता यावे यासाठी नेतृत्वबदल करणे गरजेचे झाले होते, असे स्पष्टीकरण मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचरने दिले.

रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाच वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले. मात्र, आगामी हंगामासाठी रोहितऐवजी अष्टपैलू हार्दिक पंड्याची कर्णधारपदी निवड करण्याचा मुंबईच्या व्यवस्थापनाने निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयावर समाजमाध्यमांवरून मुंबईच्या चाहत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर बाऊचर बोलत होता.

हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरातने 2022 मध्ये जेतेपद पटकावले, तर गतवर्षी हा संघ उपविजेता ठरला होता. मात्र, त्यानंतर हार्दिकने मुंबईकडे परतण्याची इच्छा व्यक्त केली आणि ती मान्यही झाली. ‘हार्दिकला परत मिळवण्याची आम्हाला संधी दिसली आणि आम्ही त्या द़ृष्टीने पावले उचलली. मात्र, यामुळे रोहितचे महत्त्व तसूभरही कमी झालेले नाही,’ असे बाऊचर एका मुलाखतीत म्हणाला.

Back to top button