वृंदा राठी बनल्या पहिल्या भारतीय कसोटी पंच | पुढारी

वृंदा राठी बनल्या पहिल्या भारतीय कसोटी पंच

नवी मुंबई, वृत्तसंस्था : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघ यांच्यात नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात नवी मुंबईतच वाढलेल्या वृंदा राठी यांनी विक्रम केला. कसोटी सामन्यातील पहिली भारतीय महिला अम्पायर होण्याचा मान वृंदा यांनी पटकावला.

वृंदा यांनी 2014 मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनद्वारे आयोजित अम्पायर्सची परीक्षा दिली होती. त्यानंतर चार वर्षांनी ती बीसीसीआयकडून आयोजित केली जाणारी अम्पायरिंगची परीक्षा उत्तीर्ण झाली. तेव्हापासून 34 वर्षांच्या वृंदाने 13 वन डे आणि 43 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत अम्पायरिंग केली आहे. 2020 मध्ये आयसीसी डेव्हलपमेंट पॅनल ऑफ अम्पायर्समध्ये तिला बढती मिळाली. वृंदा राठीने 2022 च्या बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्समध्ये देखील अम्पायरिंग केली आहे. दक्षिण आफ्रिका येथे 2023 मध्ये झालेल्या महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये देखील वृंदा राठी हिने अम्पायरिंग केले होते. ती प्रीमियर लीगची फायनल आणि एशियन्स गेममध्ये देखील अम्पायरिंग करणारी भारताची पहिली महिला अम्पायर ठरली.

इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात वृंदासोबत भारताचे के अनंतपद्मनाभन ऑन फिल्ड अम्पायर आहेत. तर वीरेंद्र शर्मा तिसरे पंच म्हणून काम पाहतात. जी.एस. लक्ष्मी या मॅच रेफरी आहेत.

Back to top button