नवी दिल्ली : भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार नसल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्याने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून माघार घेतल्यास आश्चर्य वाटायला नको. भारतीय गोलंदाजाच्या घोट्याला दुखापत झाली होती आणि तो त्याच्यावर उपचार घेत होता. त्याचे नाव कसोटी संघात जरी असले तरी बीसीसीआयनेही त्याच्या तंदुरुस्तीवर पुढील प्रवास अवलंबून असेल, हे स्पष्ट केले होते. कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ शुक्रवारी जोहान्सबर्गच्या दिशेने रवाना होणार आहे. कर्णधार रोहित शर्मासह अन्य खेळाडूंच्या पहिल्या बॅचसोबत शमी प्रवास करणार नसल्याचे वृत्त समोर येत आहे.
कर्णधारसह विराट कोहली, जसप्रीत बुमराह, आर अश्विन, नवदीप सैनी आणि हर्षित राणा हे शुक्रवारी दुबई मार्गे दक्षिण आफ्रिकेच्या दिशेने रवाना होतील. निवड समितीने अद्याप मोहम्मद शमीच्या जागी अन्य खेळाडूचे नाव जाहीर केलेले नाही, परंतु ट्वेंटी-20, वन डे आणि भारत अ मालिकेच्या निमित्ताने अनेक खेळाडू आधीच आफ्रिकेत दाखल झालेले आहेत. त्यापैकी एकाला कसोटीत संधी मिळू शकते. सध्याच्या घडीला 75 भारतीय खेळाडू आफ्रिकेत आहेत. कसोटी मालिकेसाठी शमीची निवड सशर्त होती आणि 30 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी संघांची निवड करताना बीसीसीआयने शमीवर उपचार सुरू असल्याचे स्पष्ट केले होते.
बीसीसीआयने शमीबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, मोहम्मद शमी सध्या वैद्यकीय उपचार घेत आहेत आणि त्याची उपलब्धता फिटनेसच्या अधीन आहे. वेगवान गोलंदाज घोट्याच्या दुखण्याने त्रस्त होता आणि वेदना असूनही तो वर्ल्ड कप खेळला. विशेषत: डिलिव्हरी पॉईंटवर उजव्या पायावर उतरताना अस्वस्थता जाणवत होती. दोन कसोटींपैकी पहिला सामना बॉक्सिंग डे 26 डिसेंबर रोजी सेंच्युरियन येथे सुरू होईल. दुसरी कसोटी केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे आहे, परंतु त्याआधी, 20 डिसेंबरपासून कसोटी निवडीसाठी तीन दिवसीय सामना आहे.
मोहम्मह शमीची विश्वचषक स्पर्धेत दिमाखदार कामगिरी
विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या चौथ्या साखळी सामन्यात हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या सामन्यातून शमीचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. त्याने केवळ सात सामन्यांमध्ये तब्बल २४ विकेट घेतल्या होत्या. तो २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणार गोलंदाज ठरला होता. विशेष म्हणजे या स्पर्धेत तीनवेळा ५ पेक्षा अधिक बळी घेण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावावर नोंदवला होता.याशिवाय त्याने विश्वचषकात सर्वात जलद 50 बळी घेण्याचा विक्रमही केला.
हेही वाचा…