IND-W vs ENG-W : भारत-इंग्लंड महिला संघात आजपासून एकमेव कसोटी
नवी मुंबई, वृत्तसंस्था : भारत व इंग्लंड महिला संघात आजपासून येथे एकमेव कसोटी खेळवली जाणार आहे. भारतीय महिलांनी 1995 नंतर भारतात व 2006 नंतर विदेशात कसोटी क्रिकेटमध्ये एकही पराभव पत्करलेला नाही. ती परंपरा कायम राखण्याचे आव्हान संघासमोर असणार आहे. मात्र, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने मागील दोन वर्षांपासून एकही कसोटी खेळलेली नाही, हीच एकमेव चिंतेची बाब ठरू शकते. इंग्लिश महिला संघ हिथर नाईटच्या नेतृत्वाखाली येथे आव्हान उभे करेल. पहिल्या दिवसाच्या खेळाला सकाळी 9.30 वाजता सुरुवात होणार आहे.
इंग्लिश महिला संघासाठी ही ऐतिहासिक 100 वी कसोटी असेल. त्यामुळे, ही लढत जिंकणे लक्ष्य असेल, हे साहजिकच आहे. कर्णधार हिथर नाईटने भारतात कसोटी खेळणे हे कोणत्याही खेळाडूचे स्वप्न असते आणि त्याची स्वप्नपूर्ती येथे होत आहे, असे नमूद केले. टी-20 मालिकेनंतर केवळ तीनच दिवसांच्या अंतरात कसोटी क्रिकेटसाठी मैदानात उतरणे कोणत्याही संघासाठी आव्हानात्मक असेल, याचा तिने येथे पुनरुच्चार केला.
चार दिवसांच्या या कसोटी सामन्यात रोज जवळपास 100 षटकांचा खेळ अपेक्षित असेल आणि दोन्ही संघांसाठी ही परिस्थिती आव्हानात्मक असेल, असे नाईटने शेवटी नमूद केले. इंग्लंड महिला संघाने यापूर्वी जानेवारी 2014 मध्ये आपला शेवटचा कसोटी विजय नोंदवला होता. त्यानंतर त्यांना 3 पराभव व 5 अनिर्णीत अशा कामगिरीवर समाधान मानावे लागले आहे.