IND vs SA : उसळत्या चेंडूवर सराव

IND vs SA : उसळत्या चेंडूवर सराव

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्ट्या फलंदाजीसाठी आव्हानात्मक असतात, त्यामुळे आम्ही उसळत्या चेंडूच्या खेळपट्टीवर गोलंदाजांचा कसा सामना करावा, याचा सराव करत आहोत. आगामी मालिकेत आमच्या प्रत्येक फलंदाजांकडे एक योजना असेल आणि त्यानुसारच ते पुढे जातील, असे भारताचा प्रशिक्षक राहुल द्रवीड याने सांगितले. (IND vs SA)

भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेत पोहोचला आहे, जिथे रविवार 10 डिसेंबरपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. राहुल द्रविडने पुन्हा एकदा पदभार स्वीकारला असून, प्रशिक्षक पदाच्या करारातील मुदतवाढीनंतरची ही त्याची पहिली मालिका आहे. रोहितच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव या संघाचा कर्णधार आहे. या मालिकेबाबत द्रविडने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांविरुद्ध भारतीय फलंदाजांचा द़ृष्टिकोन कसा असेल, यावर टीम इंडियाची योजना सांगितली. (IND vs SA)

स्टार स्पोर्टस्वर या दौर्‍याबद्दल बोलताना राहुल द्रविड म्हणाला, आफ्रिका खंडात खेळण्यासाठी शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक कणखरता जास्त महत्त्वाची आहे. तो पुढे म्हणाला, टी-20 मालिकेसाठी निवड झालेला संघ हा नवखा असून, त्यांना येथील खेळपट्ट्यांवर खेळण्याची सवय नाही. आम्ही प्रत्येक खेळाडूकडून एकसारखे खेळण्याची अपेक्षा करत नाही. आमची इच्छा आहे की, त्यांनी येथील परिस्थितीचा अंदाज घ्यावा आणि मग आपल्यात बदल करावे. खेळाडू जेव्हा मैदानात पोहोचतात, तेव्हा हे अधिक मानसिक कणखर असणे आवश्यक आहे. मला वाटते की, तुम्हालाही माहिती आहे, आपण जे प्रयत्न करतो ते फक्त योग्य दिशेने जात आहेत की नाही, हे पाहणे आवश्यक आहे. वस्तुस्थितीवर भर देणे गरजेचे आहे. जर आपण चांगली खेळी करत पुढे गेलो, तर त्यांनी सामना जिंकून देण्यात योगदान द्यावे.

दक्षिण आफ्रिका दौर्‍यापूर्वी राहुल द्रविड म्हणाला की, आम्ही उसळत्या चेंडूच्या खेळपट्टीवर गोलंदाजांचा कसा सामना करावा, याचा सराव करत आहोत. फलंदाजी करण्यासाठी आफ्रिकेतील खेळपट्ट्या या आव्हानात्मक आहेत. याविषयीचे आकडे तुम्हाला माहीत असतीलच. इथे फलंदाजी करणे खूप कठीण आहे. खासकरून सेंच्युरियन आणि जोहान्सबर्ग या ठिकाणी चेंडू अधिक उसळी घेतो, त्यांच्या खेळपट्टीत सतत बदल होत राहतो. त्यामुळे प्रत्येक फलंदाजाकडे आपली एक योजना असेल की, त्यांना कशाप्रकारे पुढे जायचे आहे.

राहुलच्या युवा खेळाडूंना टिप्स

आफ्रिका खंडात शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक कणखरता महत्त्वाची
परिस्थितीचा अंदाज घ्यावा आणि मग त्याप्रमाणे आपल्यात बदल करा
योजनेप्रमाणे चांगला खेळ करून संघाच्या विजयात योगदान द्यावे

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ संपला. अलीकडेच 'बीसीसीआय'ने त्याच्या कराराची मुदत वाढवण्याची अधिकृत घोषणा केली. मात्र, राहुल द्रविडचा हा कार्यकाळ किती काळ असेल, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, जूनमध्ये होणार्‍या टी-20 विश्वचषकात राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक असेल, असे मानले जात आहे. आगामी विश्वचषकाच्या द़ृष्टीने दक्षिण आफ्रिकेत होणारी टी-20 मालिका अनेक युवा खेळाडूंसाठी महत्त्वाची ठरणार असून, त्यात प्रभावी खेळ दाखवून ते संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत सहभागी होऊ शकतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news