पंचांनी आम्हाला हरवले : मॅथ्यू हेडन | पुढारी

पंचांनी आम्हाला हरवले : मॅथ्यू हेडन

बंगळूर, वृत्तसंस्था : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा सामना आम्ही जिंकला असता; पण अंपायरने आमचा पराभव केला आहे, असा आरोप ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन याने केला आहे. अर्शदीप सिंग अंपायरकडे बघून तो भारतीय संघाशी संगनमत करत असल्याचे दिसत होते. ऑस्ट्रेलियाने भारतावर केलेल्या या आरोपामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारताने एकतर्फी विजय मिळवला. भारताने या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 4-1 असा पराभव करत मालिका जिंकली आहे. भारतीय संघाने विश्वचषकातील पराभवाचे दुखणे कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. ऑस्ट्रेलियाला फक्त या मालिकेत एकच सामना जिंकता आला आहे, त्यामुळे मॅथ्यू हेडन नाराज झाला.

अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 10 धावांची गरज होती. शेवटच्या दोन चेंडूंत 9 धावांची गरज असताना पाचव्या चेंडूवर नॅथन एलिसने जोरदार फटका मारला; पण चेंडू अंपायरला लागला. अंपायरला जर चेंडू लागला नसता, तर तो सीमारेषेबाहेर जाणार हे निश्चित होते; पण अंपायरला लागल्यानंतर चेंडू तिथेच थांबला. यावर अंपायरने जाणीवपूर्वक चेंडू रोखल्याचा आरोप ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मॅथ्यू हेडनने केला आहे. तो म्हणाला, टीम इंडियाने अंपायरशी हातमिळवणी केली होती. याशिवाय 20 व्या षटकाचा पहिला चेंडू मॅथ्यू वेडच्या डोक्यावरून गेला, हा चेंडू वाईड द्यायचा होता; पण अंपायरने तो दिला नाही. या कारणांमुळे आम्हाला असे वाटते की, भारतीय संघ आणि अंपायर यांच्यात संगनमत होते.

Back to top button