Ruturaj Gaikwad Record : ऋतुराजने मोडला मार्टिन गप्टिलचा विक्रम! बिश्नोईने केली अश्विनची बरोबरी | पुढारी

Ruturaj Gaikwad Record : ऋतुराजने मोडला मार्टिन गप्टिलचा विक्रम! बिश्नोईने केली अश्विनची बरोबरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ruturaj Gaikwad Record : भारताने पाचव्या टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाचा सहा धावांनी पराभव करत मालिका 4-1 ने जिंकली. शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी गमावून 160 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाला 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 154 धावा करता आल्या. या मालिकेत ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक धावा केल्या. त्याने पाच सामन्यांत 55.75 च्या सरासरीने 223 धावा केल्या. या काळात त्याचा स्ट्राइक रेट 159.29 होता.

ऋतुराजचा विक्रम (Ruturaj Gaikwad Record)

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेत फलंदाजाने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. यापूर्वी हा विक्रम न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलच्या नावावर होता. गुप्टिलने 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 218 धावा केल्या होत्या. तथापि, द्विपक्षीय टी-20 मालिकेत भारतीय फलंदाजाने सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो ऋतुराज तिसर्‍या क्रमांकावर पोहचला आहे. त्याच्या पुढे केएल राहुल आणि विराट कोहली आहेत. ऋतुराजने या मालिकेत 21 चौकार आणि 10 षटकार मारले. ऋतुराजनंतर या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये सूर्यकुमार यादव दुसऱ्या क्रमांकावर राहिला. सूर्याने पाच सामन्यांत 144 धावा केल्या. पहिल्या आणि दुसऱ्या खेळाडूंमध्ये 79 धावांचा फरक आहे.

रवी बिश्नोईची अप्रतिम कामगिरी

भारताचा युवा लेगस्पिनर रवी बिश्नोईने या मालिकेत अप्रतिम कामगिरी केली. त्याने पाच सामन्यांत नऊ विकेट घेतल्या. त्याचा इकॉनॉमी रेट 8.20 राहिला. या मालिकेत रवी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानावर अक्षर पटेल राहिला, ज्याने पाच सामन्यांत सहा विकेट घेतल्या आणि त्याचा इकॉनॉमी रेट 6.20 होता. बिश्नोई द्विपक्षीय टी-20 मालिकेत भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. त्याने या बाबतीत रविचंद्रन अश्विनची बरोबरी केली. अश्विनने 2016 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत नऊ विकेट घेतल्या होत्या.

भारतीय फिरकीपटूंची ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंवर मात

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतीय फिरकीपटूंनी एकूण 15 विकेट घेतल्या. यादरम्यान, त्यांची सरासरी 19.2 आणि स्ट्राईक रेट 16 राहिला. म्हणजेच भारतीय फिरकीपटूंनी पाच सामन्यांमध्ये प्रत्येक 16 व्या चेंडूवर विकेट घेतल्या. या काळात भारतीय फिरकीपटूंचा इकॉनॉमी रेट 7.2 होता. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंनी या मालिकेत सहा विकेट्स घेतल्या. त्याची सरासरी 56.5 आणि स्ट्राईक रेट 33 होता. म्हणजेच ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंना या मालिकेत दर 33 चेंडूंवर एक विकेट मिळाली. या काळात त्याचा इकॉनॉमी रेट 10.27 होता.

भारताने आपले रेकॉर्ड सुधारले

टी-20 मालिकेत पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध चारपैकी तीन सामने गमावले आणि फक्त एक जिंकला. म्हणजेच भारताने या मालिकेतील चारपैकी तीन सामने धावांचा बचाव करताना जिंकले आहेत. या टी-20 मालिकेपूर्वी पर्यंत भारताने घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धचे चारही सामने धावांचा बचाव करताना गमावले होते. मात्र, आता रेकॉर्द सुधारले आहे. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मधला हा 19 वा विजय ठरला. भारतीय संघ टी-20 मध्ये एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला असून त्यांनी आपल्याच विक्रमाची बरोबरी केली आहे. पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक 20 सामने जिंकले आहेत. यानंतर भारताने ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध 19-19 सामने जिंकले आहेत. पाकिस्तानविरुद्ध 18 विजयांसह इंग्लंड तिसऱ्या स्थानावर आहे.

Back to top button