प्रशिक्षकांच्या सूचनेनुसारच सिराजची गोलंदाजी थांबवली : रोहित शर्मा | पुढारी

प्रशिक्षकांच्या सूचनेनुसारच सिराजची गोलंदाजी थांबवली : रोहित शर्मा

कोलंबो; वृत्तसंस्था :  आशिया चषक 2023 च्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा 50 धावांनी धुव्वा उडवला आणि 10 गडी राखून विजय मिळवला. या विजयानंतर भारत आठव्यांदा चॅम्पियन बनला. अंतिम सामन्यात मोहम्मद सिराजने घातक गोलंदाजी करत 7 षटकांत श्रीलंकेच्या सहा फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. सिराजने ऐतिहासिक स्पेल टाकत एका षटकात त्याने 4 विकेटस् मिळवल्या, त्याच्या या कामगिरीमुळे श्रीलंकेचे पार कंबरडे मोडले. सिराजला अधिक षटके टाकण्याची संधी मिळाली असती तर कदाचित तो आणखी विकेट घेऊ शकला असता; पण कर्णधार रोहित शर्माने त्याला रोखले; पण रोहित शर्माने सिराजला का रोखले, यामागचे नेमके कारण काय होते, हे त्याने स्वतः सामन्यानंतर सांगितले.

आशिया कप अंतिम सामन्यात मोहम्मद सिराजने सहावे षटक पूर्ण केल्यानंतर, कर्णधार रोहित शर्मा थर्ड-मॅनच्या गोलंदाजाकडे गेला, त्याच्याशी संभाषण केले आणि सिराजला दुसरे षटक टाकण्यापासून रोखले. रोहित शर्मा म्हणाला, त्या स्पेलमध्ये सिराजने सात षटके टाकली आणि सात षटके खूप आहेत, त्यामुळे मला ट्रेनरकडून मेसेज आला की आपण त्याला आता थांबवायला हवे.

रोहित म्हणाला, सिराज गोलंदाजीसाठी खूप उत्सुक होता. हा कोणत्याही फलंदाजाचा किंवा गोलंदाजाचा स्वभाव असतो, त्याला संधी दिसताच त्याचा फायदा घ्यायचा असतो. कर्णधार म्हणून इथेच माझा उपयोग होतो. प्रत्येकाला उसंत देणे आणि ताजेतवाने ठेवणे तसेच तुम्ही स्वत:वर जास्त जोर नाही देत आहात ना, या गोष्टींची मी खात्री करत असतो.

रोहित शर्माने सिराजच्या कामगिरीचे खूप कौतुक केले. रोहित म्हणाला, स्लीपमधून पाहणे खूप आनंददायी होते. इतर दोघांच्या तुलनेत सिराजने चेंडूला अधिक मूव्ह केला. दररोज प्रत्येकजण हीरो होऊ शकत नाही. हा खेळ खूप चांगला आहे, कारण दररोज एक वेगळा हीरो आपल्याला पाहायला मिळतो. जेव्हा तो (सिराज) स्पेल टाकत होता तेव्हा आम्ही सगळे त्याच्या गोलंदाजीचा आनंद घेत होतो.

Back to top button