

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदी याने आशिया चषकामधील साखळी सामन्यात भारतीय फलंदाजांना झटका दिला हाेता. कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहलीला त्याने स्वस्तात तंबूत धाडले हाेते. या सामन्यात त्याने एकूण ४ विकेट्स पटकावल्या. भारत-पाक आता सुपर ४ मध्ये आमने-सामने असणार आहेत. दरम्यान, शाहिन आफ्रिदीने आता भारताला अप्रत्यक्ष चॅलेंज दिले आहे. भारताविरुद्धच्या चांगली कामगिरी केल्यानंतर 'ही तर फक्त सुरुवात आहे', असे आफ्रिदी म्हणाला आहे. (IND vs PAK Asia Cup)
साखळी सामन्यात पाकिस्तान विराेधात भारत २५० धावांचा टप्पा गाठू शकणार नाही,असे वाटत होते. मात्र, हार्दिक पंड्या आणि इशान किशनच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने पाकिस्तानसमोर २६७ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.
शाहिन आफ्रदी म्हणाला, "भारताविरुद्धचा प्रत्येक सामना खास असतो. या सामन्याची लोक आतुरतेने वाट पाहत असतात. अंडर-१६ क्रिकेट खेळण्यापूर्वी मी एक चाहता म्हणून या सामन्याची आतुरतेने वाट पाहत होतो. हा माझा आतापर्यंतचा सर्वोत्तम स्पेल आहे असे मी म्हणू शकत नाही. ही फक्त सुरुवात आहे. त्यामुळे भारताविरुद्ध मी यापेक्षा चांगली कामगिरी करु शकतो. माझी सर्वोत्तम कामगिरी अजून येणे बाकी आहे." (IND vs PAK Asia Cup)
शाहीन आणि त्याचे सहकारी वेगवान गोलंदाज नसीम शाह आणि हरिस रौफ यांनी आशिया कपमध्ये आतापर्यंत २३ बळी घेतले आहेत. या वेळी बोलताना शाहिन म्हणाला, "आम्हाला आमची भूमिका नव्या आणि जुन्या चेंडूवरून कळते. हॅरिस आमच्यापेक्षा वेगवान आहे. नसीम आणि मी झटपट यश मिळवण्याचा प्रयत्न करतो. आमच्यातील संवाद चांगला आहे. आणि हेच आमच्या यशाचे कारण आहे." (IND vs PAK Asia Cup)
भारताविराेधातील सामन्याबाबत बाबर म्हणाला की, "मला माझ्या मला माझ्या वेगवान गोलंदाजांचा अभिमान आहे. त्यांच्यामुळेच आम्ही सर्वांवर वर्चस्व गाजवतो. मोठे सामने आणि स्पर्धा वेगवान गोलंदाज जिंकून देतात यावर माझा विश्वास आहे. त्यांचा स्वत:वर विश्वास आहे. संघातील सर्व वेगवान गोलंदाज एकमेकांना सहकार्य करतात." (IND vs PAK Asia Cup)
आम्ही प्रथम गोलंदाजी घेतली तर चांगली सुरुवात करतो. तसेच मधल्या षटकांचाही सदुपयोग करण्याचा प्रयत्न करतो. बांगलादेशविरुद्ध सामन्यात आम्ही अष्टपैलू खेळाडूला संधी दिली होती. आम्हाला सर्वात जास्त काय अनुकूल आहे ते शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या सर्व सामन्यांमध्ये, आम्ही आमच्या वेगवान गोलंदाजीसह खरोखरच चांगली कामगिरी करत आहोत. आम्ही एक संघ म्हणून खरोखर चांगले खेळत आहोत, असे ताे म्हणाला हाेता. (IND vs PAK Asia Cup)