‘शुभमन गिलला प्रमाणापेक्षा जास्त संधी’ | पुढारी

'शुभमन गिलला प्रमाणापेक्षा जास्त संधी'

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसादने शुभमन गिलच्या निवडीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गिलची निवड कामगिरीच्या आधारावर झाली नसून पक्षपाताच्या आधारावर झाली आहे, असेही तो म्हणाला. विशेष म्हणजे प्रसादने के. एल. राहुल याच्याविरोधातही अशीच आघाडी उघडली होती. तो आता शुभमनवर आगपाखड करीत आहे. व्यंकटेशने पुढे म्हटले आहे की, गिलची निवड कामगिरीवर आधारित नाही तर पक्षपातावर आधारित आहे. त्याच्या कामगिरीत सातत्याने चढ-उतार होत आहेत. अनेक माजी क्रिकेटपटू असे पक्षपातीपणा पाहूनही आवाज उठवत नाहीत याचे हे एक कारण आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शुभमन गिलची कामगिरी अत्यंत खराब राहिली आणि तो केवळ 6 धावा करून बाद झाला. अलीकडची कामगिरी पाहता गिलने आशियाबाहेर एकही प्रभावी कसोटी डाव खेळला नाही आणि त्यामुळेच त्याला टीकेला सामोरे जावे लागत आहे. व्यंकटेश प्रसादने त्याच्या ट्विटर हँडलवर लिहिले, मला शुभमन गिलच्या प्रतिभेचा आणि क्षमतेबद्दल खूप आदर आहे; परंतु दुर्दैवाने त्याची कामगिरी अत्यंत वाईट आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 30 डावांनंतर 30 ची कसोटी सरासरी सामान्य आहे. मी अशा अनेक खेळाडूंचा विचार करू शकत नाही ज्यांना इतक्या संधी देण्यात आल्या आहेत.

प्रसाद म्हणाला, ‘बरेच लोक अव्वल फॉर्ममध्ये आहेत. पृथ्वी शॉ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, सर्फराज खान प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शतक झळकावत आहे आणि बरेच लोक गिलपेक्षा अधिक संधींना पात्र आहेत. काही लोक इतके भाग्यवान असतात की त्यांना यशस्वी होण्यासाठी संधी दिली जाते तर काहींना तसे करण्याची परवानगी नसते.’

Back to top button