Virat Kohli Team India : विराट कधी सुधारणार? वर्ल्डकपपूर्वी तोडगा काढ, नाहीतर… | पुढारी

Virat Kohli Team India : विराट कधी सुधारणार? वर्ल्डकपपूर्वी तोडगा काढ, नाहीतर...

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाला वेस्ट इंडिज दौऱ्यावर 2 कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामने खेळायचे आहेत. या दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने होणार आहे, त्यातील पहिला सामना 12 जुलैपासून डॉमिनिका येथे खेळवला जाणार आहे. कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी, भारतीय कसोटी संघाच्या सर्व 16 खेळाडूंनी स्थानिक क्लब क्रिकेटपटूंसोबत दोन दिवसीय सराव सामना खेळला.

या सराव सामन्यात सर्वांच्या नजरा स्टार फलंदाज विराट कोहलीवर खिळल्या होत्या. त्या सामन्यात किंग कोहली ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू खेळताना संघर्ष करताना दिसला. ऑफ-स्टंपच्या बाहेर जाणारे चेंडू कोहलीला त्रास देत आहेत आणि वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने याचा पुरेपूर फायदा घेतला. उनाडकटच्या अशा चेंडूवर तो पहिल्या स्लिपमध्ये झेलबाद झाला.

कोहलीची ही कमजोरी कधी दूर होणार?

बाहेर चेंडूशी छेडछाड करताना बाद झाल्याने विराट कोहलीची जुनी कमजोरी अजूनही कायम असल्याचे दिसून येते. 34 वर्षीय कोहली याआधीही अनेक वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशाच पद्धतीने बाद झाला आहे. यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतीय भूमीवर एकदिवसीय विश्वचषक होणार आहे, अशा परिस्थितीत किंग कोहलीला ही कमजोरी दूर करावी लागणार आहे.

यशस्वी जैस्वालला पदार्पणाची संधी मिळणार

सराव सामन्यात जवळपास 50 ते 75 चेंडू खेळल्यानंतर बहुतांश फलंदाज निवृत्त झाले. युवा खेळाडू यशस्वी जैस्वालने 76 चेंडूत 54 धावा केल्या. या खेळीमुळे यशस्वी जैस्वालने प्लेइंग-11 मध्ये निवड होण्याचा दावा पक्का केला. जैस्वालचे कसोटी पदार्पण निश्‍चित असले तरी त्याचे प्रदर्शन कसे असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तो डावाची सुरुवात करतो की चेतेश्वर पुजारा ज्या तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला मैदानात उतरायचा त्या क्रमांकावर खेळेल हे पहावे लागणार आहे.

शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळणार?

सराव सामन्यात कर्णधार रोहित शर्माने 67 धावा केल्या आणि तो यशस्वीसोबत सलामीला मैदानात उतरला. जैस्वालला सराव सामन्यात नियमित सलामीवीर शुभमन गिलच्या वर पाठवण्याचा अर्थ संघ व्यवस्थापन त्याच्यासोबत डावाची सुरुवात करू शकेल. गिल हा मधल्या फळीतील फलंदाज आहे, ज्याने अंडर-19 आणि इंडिया-ए साठी तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. त्यावेळी राहुल द्रविडच त्या संघांचा प्रशिक्षक होता.

गिलने 2019 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध भारत-अ साठी पाचव्या क्रमांकावर खेळताना 204 धावा केल्या होत्या. डॉमिनिकाच्या कोरड्या खेळपट्टीवर रविचंद्रन अश्विन हा दुसरा फिरकी गोलंदाज ठरू शकतो. दुसरीकडे, वेगवान गोलंदाजीत मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांच्यासह नवदीप सैनी, उनाडकट की मुकेश कुमार यांच्यापैकी कोणाची निवड होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भारताचा कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.

Back to top button