भारत – पाकिस्तान यांच्यातील वर्ल्डकप सामना म्हटलं की मौका मौका हे जाहिरातीचे जिंगल हमकास वाजते. मात्र यंदाच्या टी २० वर्ल्डकपमध्ये बाबर आझम आणि त्याच्या नेतृत्वातील पाकिस्तानच्या संघाने जुन्या इतिहासाचा अध्याय संपवला. तब्बल १२ वर्ल्डकपमधील पराभव पचवल्यानंतर अखेर बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तानने भारताला वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदा मात दिली.
बाबर आझमला पाकिस्तानचा विराट कोहली म्हणून संबोधला जातो. विराट प्रमाणेच बाबर आझमही एकदिवसीय आणि वनडे सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. त्याचे धावा करण्याचे सातत्य वाखाण्याजोगे आहे. फक्त विराट आणि बाबरमध्ये एक फरक आहे. बाबर आझम हा शांत स्वभावाचा आहे तर विराटची मैदानावरील देहबोली आक्रमक असते. विशेष म्हणजे विराट कोहली आणि बाबर आझम या दोघांनीही आधी १९ वर्षाखालील वर्ल्डकप गाजवला आहे आणि त्या जोरावर राष्ट्रीय संघात प्रवेश केला आहे.
बाबर आझमने २०१० आणि २०१२ असे दोन १९ वर्षाखालील वर्ल्डकप खेळला आहे. त्याने २०१२ च्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचे नेतृत्वही केले आहे. मात्र उपांत्यपूर्व फेरीत भारतीय संघानेच त्यांचे परतीचे तिकीट काढले होते. याचा अर्थ असा की बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने पहिल्या नाही तर दुसऱ्या प्रयत्नात भारताला वर्ल्डकपमध्ये मात दिली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानचा डाव १३६ धावात संपुष्टात आला होता. बाबर आझमने याही सामन्यात अर्धशतक झळकावले होत. मात्र भारताला ही १३६ धावांचे आव्हान पार करताना चांगलाच घाम फुटला होता. विजयसाठीच्या १३७ धावा करताना भारताचे ९ फलंदाज खर्ची पडले होते. भारताकडून बाबा अपराजीतने ५१ धावांची खेळी केली होती. या वर्ल्डकमध्ये बाबर आझमने पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या.
बाबर आझम हा क्रिकेटकडे वळण्यात त्याचे भाऊ कमरान अकमल आणि उमर अकमल यांचा महत्वाचा वाटा आहे. बाबर आझमपेक्षा मोठे असले हे दोन्ही भाऊ पाकिस्तानकडून खेळत होते. त्यानंतर आता बाबर आझमही क्रिकेटचे मैदान गाजवू लागला आहे.