

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी ( WTC final ) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होत आहे. उभय संघांमधील हा सामना लंडनमधील ओव्हल मैदानावर ७ जूनपासून सुरू होईल. कसोटी क्रमवारीत टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर असून कांगारूंचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे हा ब्लॉकबस्टर सामना अत्यंत चुरशीचा होण्याची अपेक्षा आहे. आता सामन्याच्या निकालावर परिणाम करणार्या खेळाडूंच्या कामगिरीवर क्रिकेटप्रेमीचे लक्ष असणार आहे. जाणून घेवूया सामन्यात प्रभावी कामगिरीची अपेक्षा असणारे दाेन्ही संघातील खेळाडूंविषयी….
नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेत टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीची बॅट तळपली. त्याने यंदाच्या आयपीएलच्या हंगामात दोन शतकेही झळकावली. विराट पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आला असून आता कसाेटी विश्वचषक अंतिम सामन्यासाठी तो सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या २४ कसोटी सामन्यांमध्ये त्याने ४८.२६ सरासरीने आठ शतके आणि पाच अर्धशतकांसह १,९७९ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्कृष्ट धावसंख्या १८६ आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सर्व फॉर्मेटमध्ये विराटने ९२ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ५०.९७ च्या सरासरीने ४,९४५ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या १८६ आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १६ शतके आणि २४ अर्धशतके केली आहेत. त्यामुळे आता कसोटी फायनलमध्ये विराटच्या कामगिरीकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे.
टीम इंडियाचा उत्कृष्ट फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचे ऑस्ट्रेलियाच्या संघासमोर आव्हान असणार आहे. त्याची अचूक फिरकी गोलंदाजी आणि कसोटीतील अनुभव हा टीम इंडियासाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे अश्विन हा ऑस्ट्रेलियासाठी मोठा धोका आहे. विदेशात त्याने नेहमीच संघासाठी मोलाची कामगिरी केली आहे. आता फायनलमध्ये अश्विनची फिरकी टीम इंडियासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिलने नुकतेच आयपीएलमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. तब्बल ८९० धावा करत यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरण्याचा बहुमान त्याने मिळवला आहे.
यापूर्वी शुभमन गिल याने कसोटी क्रिकेटमध्येही आपली क्षमता सिद्ध केली आहे. परिस्थितीशी जळवून घेत दर्जेदार गोलंदाजांच्या आक्रमणाला सामोरे जाण्याची त्याची क्षमता ऑस्ट्रेलिया संघासमोरील मोठे आव्हान असणार आहे. शुभमनच्या फलंदाजीवर ऑस्ट्रेलियाचे विशेष लक्ष असणार आहे.
कसोटी क्रिकेटमधील उत्कृष्ट गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याचा समावेश होतो. कसोटी विश्वचषक अंतिम सामन्यात पॅट कमिन्स हाच ऑस्ट्रेलियाच्या संघाचे नेतृत्त्व करणार आहे. गोलंदाजीतील अचूकता आणि वेग यावर त्याचे कमालीचे नियंत्रण आहे. कोणत्याही खेळपट्टीवर तो आपला प्रभाव दाखवतो. त्यामुळे टीम इंडियासाठी पॅट कमिन्सचाला सडेतोड प्रत्युत्तर देण्याचे आव्हान असेल. प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांवर दडपण आणत महत्त्वाच्या क्षणी संघासाठी यश मिळवण्याची त्याची क्षमता आहे. त्यामुळेच पॅट कमिन्ससमाेर भारतीय फलंदाजांची कसाेटी लागेल असे मानले जात आहे.
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लॅबुशेन हा अंतिम सामन्यात महत्त्वाची कामगिरी बजावू शकतो. लॅबुशेन काउंटी चॅम्पियनशिपमध्ये आठ डावात दोन शतके आणि दोन अर्धशतके झळकावली आहे. ऑस्ट्रेलियातील वातावरणात त्याची फलंदाजी आणखी बहरते. त्यामुळे चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या स्टीव्ह स्मिथच्या जागी लॅबुशेनने आपले स्थान निर्माण केले आहे. लॅबुशेन याला रोखणे हे टीम इंडियातील गोलंदाजासमोर मोठे आव्हान असणार आहे.
हेही वाचा :