रोहित शर्मा याची टी-20 संघाच्या कर्णधारपदी वर्ल्डकपनंतर निवड ? | पुढारी

रोहित शर्मा याची टी-20 संघाच्या कर्णधारपदी वर्ल्डकपनंतर निवड ?

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : संयुक्त अरब अमिरात व ओमनामध्ये सध्या सुरू असलेल्या टी-20 वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेनंतर भारतीय टी-20 क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी जबाबदारी ‘हिटमॅन’ रोहित शर्मा याच्यावर सोपवण्यात येणार असल्याचे समजते. विराट कोहलीनंतर या प्रारूपात भारतीय संघाचा कर्णधार कोण बनेल? याची माहिती अद्याप बीसीसीआयने जाहीर केलेली नाही. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोहलीनंतर भारताच्या टी-20 संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्मा याची निवड होऊ शकते.

बीसीसीआयच्या एका अधिकार्‍याने रोहितच्या नावावर कर्णधार म्हणून शिक्कामोर्तब होणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. या अधिकार्‍याने सांगितले की, रोहित शर्माच टी-20 संघाचा कर्णधार बनेल आणि याची घोषणा सध्या सुरू असलेली वर्ल्डकप स्पर्धा संपल्यानंतर करण्यात येईल.

कोहलीने 2017 मध्ये भारताच्या टी-20 संघाच्या कर्णधारपदाची धुरा हाती घेतली होती. त्याने 45 टी-20 लढतीत भारताचे कर्णधारपद सांभाळताना 27 सामने जिंकले. तर, 14 सामन्यांत त्यांने पराभव पत्करले. दोन सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. तर, रोहितच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने पाचवेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे.

Back to top button