टी-20 वर्ल्डकप : पाकिस्तानने भारताच्या नावासह ‘लाँच’ केली नवीन जर्सी | पुढारी

टी-20 वर्ल्डकप : पाकिस्तानने भारताच्या नावासह ‘लाँच’ केली नवीन जर्सी

दुबई ; वृत्तसंस्था : राजकारण असो वा खेळ, भारताविरुद्ध कुरघोडी करण्याची एकही संधी पाकिस्तान सोडत नाही, हे सवार्र्ंनाच माहिती आहे. टी-20 वर्ल्डकप स्पर्धेबाबतही पाकिस्तानने अशीच एक आगळीक केली होती. त्यांनी आपल्या जर्सीवरील स्पर्धेच्या लोगोखाली असलेले भारताचे नाव काढून टाकले होते. परंतु, बीसीसीआयच्या कडक भूमिकेपुढे त्यांना नमते घ्यावे लागले आणि त्यांनी मुकाटपणे भारताच्या नावासह नवीन जर्सी ‘लाँच’ केली आहे.

यंदाचा टी-20 वर्ल्डकप कोरोनाच्या कारणामुळे भारताऐवजी संयुक्त अरब अमिरात येथे होत असला, तरी बीसीसीआयकडेच या स्पर्धेचे यजमानपद आहे. आयसीसीच्या नियमांनुसार, आयसीसी स्पर्धेतील सर्व संघांना त्यांच्या जर्सीवर उजव्या बाजूला स्पर्धेच्या लोगोखाली यजमान देशाचे नाव आणि वर्षासह स्पर्धेचे नाव लिहिणे अनिवार्य आहे.

पाकिस्तान संघाने जर्सीवर लोगोखाली भारताऐवजी यूएईचे नाव टाकून आपला भारतद्वेष दाखवून दिला होता. परंतु, भारताने आयसीसीमार्फत पाकिस्तानला स्पर्धेतून बाद करण्याची धमकी दिल्यानंतर मात्र पाकिस्तानचा माज उतरला. भारताच्या कडक भूमिकेपुढे नमते घेत त्यांनी नवी जर्सी ‘लाँच’ केली.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील तणावाच्या संबंधांमुळे दोन्ही संघ एकमेकांचे दौरे करीत नाहीत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या सामन्यांत त्यांची लढत लक्षणीय असते.

आता 17 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या वर्ल्डकपमधील भारत – पाक लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, सामन्याआधी पाकिस्तानच्या जर्सीवरूनच पाकच्या संघाची चर्चा रंगली होती. पाकिस्तानने वर्ल्डकपच्या जर्सीवर यजमान असणार्‍या भारताच्या जागी सामने पार पडणार असलेल्या यूएईचे नाव लिहिले होते.

विशेष म्हणजे इतर सर्व संघांनी भारताचे नाव लिहिले असतानाही पाकिस्तानने अशाप्रकारे भारताचा द्वेष करण्यासाठी हे कृत्य केले होते. मात्र, आता पाकिस्तानच्या संघाला तो निर्णय बदलावा लागला आहे. पीसीबीने पाकिस्तान क्रिकेट संघाची नवीन जर्सी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये, ‘इंडिया’ हे नाव लिहिण्यात आले आहे. त्यामुळेच, इच्छा नसताही पाकिस्तानच्या खेळाडूंना ‘इंडिया’ लिहिलेली जर्सी घालूनच मैदानात उतरावे लागणार आहे.

टी-20 विश्वचषक आधी भारतात खेळला जाणार होता. परंतु, भारतात कोरोना महामारीमुळे, बीसीसीआय आणि आयसीसीने परस्पर संमतीनंतर हे ठिकाण ओमान आणि यूएईला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान संघ भारतासह दुसर्‍या गटामध्ये आहे. या गटात भारताशिवाय अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडचे संघ देखील सहभागी आहेत. पाकिस्तानने 2009 मध्ये टी-20 विश्वचषक चषक जिंकली. तर, 2007 मध्ये संघ अंतिम फेरीत पोहोचला होता.

Back to top button