IND vs AUS ODI : चेन्नईत रोहित सेनेपुढे ‘हे’ आव्हान, टीम इंडिया संकटात | पुढारी

IND vs AUS ODI : चेन्नईत रोहित सेनेपुढे ‘हे’ आव्हान, टीम इंडिया संकटात

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs AUS ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील निर्णायक सामना 22 मार्च रोजी चेन्नई येथे खेळला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाला येथील चेपॉक मैदानावर सावधगिरी बाळगावी लागणार आहे. विशेषत: दोन सामन्यांत आठ विकेट्स घेणाऱ्या मिचेल स्टार्कमुळे भारतीय फलंदाजांना सुरुवातीच्या षटकांमध्ये संयमी खेळी करावी लागेल.

चेपॉक येथील खेळपट्टी साधारणपणे फार वेगवान मानली जात नाही. आयपीएल आणि मागील आंतरराष्ट्रीय सामन्यांप्रमाणे येथे गोलंदाजांना मदत मिळू शकते. सामन्याच्या दिवशीही पावसाचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत वेगवान गोलंदाजांना सामन्याच्या सुरुवातीला म्हणजेच पहिल्या डावाच्या सुरुवातीच्या षटकांमध्ये मदत मिळू शकते. मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने भारतीय फलंदाजांना अडचणीत आणले आहे. त्याने मुंबईत 3 तर विशाखापट्टणम येथे 5 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. याचाच अर्थ भारतीय फलंदाजांना येथे विजय मिळवायचा असेल, तर ही गंभीर समस्या सोडवावी लागेल. (IND vs AUS ODI)

चेपॉकमध्ये 6 वर्षांची प्रतीक्षा संपणार का?

भारतीय संघाने यावर्षी 8 वनडे सामने खेळले आहेत आणि सलग सात विजयानंतर विशाखापट्टणम येथे वर्षातील पहिला पराभव झाला. तो पराभव अतिशय लाजिरवाणा ठरला. कारण टीम इंडियाचा डाव अवघ्या 117 धावांवर आटोपला आणि कांगारू संघाने 11 षटकांत 10 विकेट्स, 234 चेंडू राखून सामना जिंकला. अशा परिस्थितीत चेन्नई येथे निर्णायक सामना खेळला जाणार आहे.

टीम इंडियाने या मैदानावर एकूण 14 सामने खेळले आहेत. त्यापैकी 7 जिंकले असून 7 सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. टीम इंडियाने येथे 2019 मध्ये शेवटचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात पाहुण्या विंडिजने 8 विकेट्स राखून विजयाची नोंड केली होती. तर 2017 मध्ये या मैदानावर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. ज्यात विजय मिळाला होता. म्हणजेच 6 वर्षांनंतर टीम इंडियाला पुन्हा कांगारूंना हरवण्याची संधी आहे.

टीम इंडियाची अडचण काय आहे?

या मालिकेत भारतीय संघाची सर्वात मोठी समस्या समोर आली आहे ती म्हणजे टॉप ऑर्डरचे अपयश. मिचेल स्टार्कने पहिल्या आणि दुस-या सामन्यात भारतीय टॉप ऑर्डरला उद्ध्वस्त केले. मुंबईत टीम इंडियाने 16 धावांत तीन विकेट गमावल्या. यानंतर निम्मा संघ 80 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांनी संयमी खेळी करून कमी लक्ष्याचाह पाठलाग करून संघाला विजयापर्यंत नेले. पण विशाखापट्टण येथे असे घडले नाही. भारताचा एकही फलंदाज टिकू शकला नाही. शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांना खातेही उघडता आले नाही. सूर्या तर दोन्ही सामन्यांत गोल्डन डक ठरला आहे. स्टार्कने त्याची दोन्हीवेळा शिकार केली. अशा स्थितीत त्याला चेन्नईत शेवटची संधी मिळू शकते, असे काही तज्ञांनी व्यक्त केले आहे. (IND vs AUS ODI)

Back to top button