पुढारी ऑनलाईन डेस्क : पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर मालिकेतील चौथी आणि शेवटची कसोटी अनिर्णित राहिली आहे. यासह भारताने ही मालिका 2-1 ने जिंकली. त्याचबरोबर भारताने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही प्रवेश केला असून त्यात ऑस्ट्रेलियाशी विजेतेपदाची लढत होणार आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा केल्या, त्याला प्रत्युत्तरात भारताने 571 धावा केल्या आणि 91 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने पाचव्या दिवशी 2 गडी गमावून 175 धावा केल्या आणि सामना अनिर्णित राहिला.
सामन्याचा कोणताही निकाल लागण्याची चिन्हे दिसत नसल्याने दोन्ही संघांच्या कर्णधारांनी परस्पर संमतीने सामना संपल्याची घोषणा केली. घोषणा झाली तेव्हा मार्नस लॅबुशेन 63 आणि स्टीव्ह स्मिथ 10 धावांवर नाबाद परतले. अखेरच्या सत्रातील 18 षटके शिल्लक राहिली. अश्विन आणि अक्षर पटेल याला एक-एक विकेट मिळाली.
टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा सलग चौथा कसोटी मालिका विजय असून अशी कामगिरी करणारा भारताचा संघ हा आशियातील पहिला संघ ठरला आहे. एवढेच नाही तर भारताने घरच्या मैदानावर सलग सहाव्यांदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे. यापूर्वी 2004 मध्ये टीम इंडियाला घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला होता. संघाने घरच्या मैदानावर खेळलेल्या 14 पैकी फक्त चार मालिका गमावल्या आहेत.
अहमदाबाद कसोटीत पाचव्या दिवशी चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 2 बाद 158 होती. यावेळी ऑस्ट्रेलियन संघ भारतापेक्षा 67 धावांनी पुढे गेला होता.
153 धावांवर ऑस्ट्रेलियाची दुसरी विकेट पडली. ट्रॅव्हिस हेड 163 चेंडूत 90 धावा काढून बाद झाला. अक्षर पटेलने त्याला क्लीन बोल्ड केले.
मार्नस लॅबुशेनने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ट्रॅव्हिस हेडसोबत शतकी भागीदारी करून आपल्या संघावरील पराभवाचा धोका टळला. आता हा सामना अनिर्णितेच्या मार्गावर आहे. लबुशेनचे हे कसोटीतील 15 वे अर्धशतक आहे.
ट्रॅव्हिस हेड आणि लबुशेन यांच्यातील शानदार भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाची धावसंख्या एका विकेटवर 150 धावांच्या जवळ पोहोचली आहे. यासह ऑस्ट्रेलियाची आघाडीही 50 हून अधिक झाली आहे. लबुशेन आपले अर्धशतक आणि हेड शतकाच्या जवळ पोहोचला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येने एका विकेटवर 100 धावांचा टप्पा पार केला. ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन यांच्यातही शतकी भागीदारी झाली. हे दोन्ही फलंदाज मोठी खेळी करण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत. हा सामना अनिर्णीत राहिल्यास दोघेही त्यांच्या वैयक्तिक गुणसंख्येत भर घालू शकतात.
ट्रॅव्हिस हेडने अर्धशतक झळकावले. त्याने 112 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. त्याचे हे 13 वे कसोटी अर्धशतक आहे. त्याच्या या शानदार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाचा पराभवाचा धोका टळला आहे. आता हा सामना अनिर्णित राहणे जवळपास निश्चित झाले आहे. हेड आणि लबुशेन यांच्यात चांगली भागीदारी झाली आहे. दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघाला संकटातून बाहेर काढले आहे.
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट 10 व्या षटकात 14 धावांवर पडली. रविचंद्रन अश्विनने मॅथ्यू कुहनेमनला पायचीत करून भारताला पहिले यश मिळवून दिले. कुहनेमनने 35 चेंडूत सहा धावा केल्या. आज पाचव्या दिवशी 50 षटकांच्या खेळानंतर ऑस्ट्रेलियाने 1 गडी गमावत 122 धावा केल्या आहेत.