INDvsAUS Test : विराट आणि अक्षरची शानदार खेळी; भारत मजबूत स्थितीत

INDvsAUS Test : विराट आणि अक्षरची शानदार खेळी; भारत मजबूत स्थितीत

पुढारी ऑनलाईन डेस्क : INDvsAUS Test : अहमदाबादमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना खेळला जात आहे. आज (12 मार्च) सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. सध्या संघाची धावसंख्या 170 षटकात 5 बाद  538 आहे.

अक्षर पटेलचे अर्धशतक

सामन्याच्या 168 ओव्हरमध्ये अक्षर पटेलने 97 चेंडू खेळून आपले अर्धशतक  पूर्ण केले. यामध्ये त्याने 1 षटकार
आणि 4 चौकार लगावले.

सामन्यात भारताची आघाडी, विराटच्या १५० धावा

अहमदाबाद कसोटीत चौथ्या दिवशी तिसऱ्या सत्राचा खेळ सुरू झाला आहे. विराट कोहली आपल्या 150 धावापूर्ण केल्या आहेत. त्याचवेळी अक्षर पटेलही अर्धशतकाच्या जवळ आहे. भारताची धावसंख्या 500 धावांच्या जवळ पोहोचली आहे.

चहापानापर्यंत भारताची धावसंख्या 5 बाद 472

सामन्याच्या चौथ्या दिवशी चहापानापर्यंत भारताची धावसंख्या 5 बाद 472 आहे. भारतीय संघ अजूनही ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येपेक्षा आठ धावांनी मागे आहे. विराट कोहली 135 आणि अक्षर पटेल 38 धावांवर खेळत आहे. दोघांमध्ये 79 धावांची भागीदारी झाली आहे.

विराट कोहलीचे शतक

विराट कोहलीने आपले शतक पूर्ण केले आहे. त्याने 241 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या. यादरम्यान त्याने पाच चौकार मारले. यासह भारताची धावसंख्या 400 च्या पुढे गेली. विराटने 23 नोव्हेंबर 2019 रोजी कोलकाता येथे बांगलादेशविरुद्धच्या डे-नाईट कसोटीत शेवटचे शतक झळकावले होते. आता 3 वर्षे 3 महिने 17 दिवसांच्या (1204 दिवस) प्रतीक्षेनंतर विराटच्या बॅटने तीन आकडी धावसंख्येचा टप्पा पूर्ण केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचे सातवे, कसोइटीतील 28 वे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधेल त्याचे हे 75 वे शतक आहे.

भारताचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला

भारताचा निम्मा संघ 393 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताची पाचवी विकेट श्रीकर भरतच्या रूपाने पडली. भरतची विकेट नॅथन लायनने घेतली. भरतने 88 चेंडूंत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 44 धावा केल्या. त्याने विराटसोबत अर्धशतकी भागीदारी करून भारतीय संघाला चांगल्या स्थितीत पोहचवले.

टीम इंडियाने कांगारूंना चोख प्रत्युत्तर दिले

अहमदाबाद येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटीत टीम इंडियाने कांगारूंना चोख प्रत्युत्तर दिले आहे. चौथ्या दिवशी उपाहारापर्यंत भारतीय फलंदाजांनी सुरुवातीच्या 5 विकेटसाठी 50 किंवा त्याहून अधिक धावांची भागिदारी रचली. टीम इंडियाने कसोटीच्या एका डावात पहिल्या 5 विकेटसाठी 50 किंवा त्याहून अधिक धावांची भागीदारी करण्याची ही तिसरी वेळ आहे.

1993 आणि 2007 मध्येही झाला होता असा पराक्रम

भारताने 1993 मध्ये पहिल्यांदा असा पराक्रम केला होता. मुंबईत खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी इंग्लंडविरुद्ध पहिल्या 5 विकेटसाठी 50 हून अधिक धावांची भागीदारी केली. यानंतर 2007 मध्ये बांगलादेशविरुद्ध मीरपूर कसोटीत अशी किमया घडली होती. मीरपूर कसोटीत पहिल्या 3 विकेटसाठी भारताकडून 100 हून अधिक धावांची भागीदारी झाली होती.

पहिल्या सत्राचा खेळ संपला

पहिल्या सत्राचा खेळ चौथ्या दिवशी संपला तेव्हा भारताची धावसंख्या 4 बाद 362 आहे. भारतीय संघ अजूनही ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येपेक्षा 118 धावांनी मागे आहे. विराट कोहली 88 आणि श्रीकर भरत 25 धावांवर खेळत आहेत. दुसऱ्या सत्रात कोहली आपले शतक पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, उपहारापूर्वी विराट कोहली आणि श्रीकर भरत यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. दोन्ही फलंदाजांनी सावधपणे खेळ केला.

श्रेयस अय्यरच्या दुखापतीने भारताला धक्का

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी श्रेयस अय्यरला पाठदुखीचा त्रास झाला होता. यानंतर त्याला तपासणीसाठी रुग्णायलात नेण्यात आले. सध्या बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्यांची काळजी घेत आहे. भारताच्या पहिल्या डावात अय्यरच्या जागी श्रीकर भरतला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले.

भारताची चौथी विकेट

309 धावांवर भारताची चौथी विकेट पडली. रवींद्र जडेजा 84 चेंडूत 28 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार आणि एक षटकार लगावला. टॉड मर्फीने त्याला उस्मान ख्वाजाकडून झेलबाद केले.

सामन्यात आतापर्यंत काय घडले…

अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. उस्मान ख्वाजाच्या 180 धावा आणि कॅमेरून ग्रीनच्या 114 धावांमुळे कांगारू संघाने पहिल्या डावात 480 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने शुभमन गिलचे शतक आणि विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 289 धावा केल्या होत्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news