Team India Vice Captain : ‘हे’ तीन खेळाडू होऊ शकतात भारताचे नवे उपकर्णधार, रोहित शर्मा लवकरच निर्णय घेणार | पुढारी

Team India Vice Captain : ‘हे’ तीन खेळाडू होऊ शकतात भारताचे नवे उपकर्णधार, रोहित शर्मा लवकरच निर्णय घेणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India Vice Captain : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 1 मार्चपासून खेळवला जाणार आहे. मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांसाठी टीम इंडियाचा संघ 19 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आला. संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, केएल राहुलाची उपकर्णधार पदावरून उचलबांगडी केली आहे. त्यामुळे सध्याच्या संघातील हे महत्त्वाचे पद रिक्त आहे. आता पुढचा उपकर्णधार कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये केएल राहुल टीम इंडियाचा उपकर्णधार होता. आता हे पद रिक्त असून या पदासाठी रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाला निर्णय घ्यायचा आहे. संघातील तीन खेळाडू हे पद सांभाळू शकतात, असे भाकीत अनेकांनी वर्तवले आहे. (Team India Vice Captain)

आर. अश्विन

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू आर अश्विन टीम इंडियाचा नवा उपकर्णधार बनू शकतो. त्याला कर्णधारपदाचा अनुभव आहे. अशा स्थितीत तो टीम इंडियाचा नवा उपकर्णधार बनू शकतो. अश्विन संघातील या स्थानासाठी योग्य खेळाडू आहे, असे माजी खेळाडूंचे म्हणणे आहे. अश्विनने अलीकडच्या काळात कसोटी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने 90 कसोटी सामन्यांमध्ये 2.78 च्या इकॉनॉमीने 463 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने बॅटने 3103 धावा केल्या आहेत. (Team India Vice Captain)

चेतेश्वर पुजारा

या यादीतील दुसरे नाव म्हणजे टेस्ट स्पेशलिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या चेतेश्वर पुजाराचे. पुजाराने भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत. अलीकडेच त्याने दिल्लीत 100 वा कसोटी सामना खेळला. टीम इंडियाचा नवा उपकर्णधार होण्यासाठी पुजारा हा एक चांगला पर्याय आहे. पुजारा भारताकडून फक्त कसोटी क्रिकेट खेळतो. अशा परिस्थितीत तो संघाचा उपकर्णधार झाला तरी त्याच्यावर इतर खेळाडूंच्या तुलनेत कमी दबाव असेल आणि तो अधिक चांगली कामगिरी करू शकेल. पुजाराने भारतासाठी 100 कसोटी सामन्यांमध्ये 7052 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या नावावर 19 शतके आणि तीन द्विशतके आहेत.

रवींद्र जडेजा

भारतीय संघाचा नवा उपकर्णधार बनू शकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रवींद्र जडेजाचाही समावेश आहे. 2012 मध्ये भारताकडून कसोटी पदार्पण करणाऱ्या जडेजाने आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत जडेजा पहिल्या क्रमांकावर आहे. त्याची कसोटी कारकीर्द चमकदार आहे. त्याने 62 सामन्यात 36.89 च्या सरासरीने 2619 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 259 विकेट्सही घेतल्या आहेत. उपकर्णधारपदासाठी जडेजाच्या नावावरही संघ व्यवस्थापन विचार करू शकते. (Team India Vice Captain)

Back to top button