नवी दिल्ली : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेच्या तोंडावर दुखापतीमुळे बाहेर झालेला श्रेयस अय्यर पुन्हा एकदा भारतीय संघात सामील होणार आहे. बीसीसीआयने याबाबत माहिती दिली असून अय्यर दुसर्या कसोटीत अंतिम संघाचा हिस्सा असण्याची दाट शक्यता आहे.
भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज श्रेयस अय्यरने पाठीच्या दुखापतीनंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याचे पुनर्वसन यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. त्यामुळे आता अय्यर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्या सामन्यासाठी भारतीय संघाच्या ताफ्यात सामील झाला आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने मंजुरी दिली आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेसाठी दुसर्या कसोटीपूर्वी श्रेयस अय्यर नवी दिल्लीत संघात सामील होईल.
सध्या भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात भारतीय फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांच्या शानदार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव झाला. जवळपास 5-6 महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन करणार्या जडेजाने पहिला सामना अविस्मरणीय केला.