IND vs AUS Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियातील तिसऱ्या कसोटीचे ठिकाण बदलणार? | पुढारी

IND vs AUS Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियातील तिसऱ्या कसोटीचे ठिकाण बदलणार?

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs AUS Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील नागपूर कसोटीचा निकाल अवघ्या अडीच दिवसांत लागल्यानंतर थेट तिस-या कसोटीची चर्चा रंगली आहे. उभय संघामधील तिसरा कसोटी सामना धर्मशाला ऐवजी मोहाली येथे खेळवला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. हा सामना 1 ते 5 मार्च दरम्यान खेळवला जाणार आहे.

क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, धर्मशाला येथेल मैदान अद्याप पूर्णपणे तयार झालेले नसून तेथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचे आयोजन करता येणार नाही, अशी चर्चा सुरू आहे. अशा स्थितीत बीसीसीआयला शेवटच्या क्षणी स्थळ बदलण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागू शकतो.

धर्मशालाचे स्टेडियम जगातील सर्वात सुंदर क्रिकेट स्टेडियमपैकी एक मानले जाते, जे उंच टेकड्यांनी वेढलेले आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची तिसरी कसोटी येथे खेळवण्यात येणार असल्याची घोषणा होताच प्रत्येक क्रिकेट चाहत्यांमध्ये जल्लोष झाला होता. पण आता ते शक्य होईल असे वाटत नाही.

धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडियमवर शेवटचा प्रथम श्रेणी सामना 2020 मध्ये खेळला गेला होता. त्यानंतर या मैदानामध्ये नुतनीकरणाचे सुरू झाले. येथे नवीन आउटफिल्ड आणि नवीन ड्रेनेज सिस्टम तयार केली जात आहे. या वर्षाच्या सुरुवातीला हे काम पुर्णत्वास जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, येथे होत असलेल्या संततधार पावसाने विलंब होत गेला.

दरम्यान, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यापूर्वी धर्मशाळा येथील मैदान तयार होईल, असे असोसिएशनने सांगितले आहे. पण, या मैदानावर सामना खेळवायचा की नाही याबाबतचा अंतिम निर्णय बीसीसीआयच्या चौकशीनंतरच घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून समजते आहे. मोहालीशिवाय विशाखापट्टणम, राजकोट आणि पुणे ही शहरेही तिसरा कसोटी सामना आयोजनाच्या शर्यतीत असल्याचे मानले जात आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उर्वरीत तीन कसोटी सामन्यांचे वेळापत्रक

दुसरी कसोटी : 17 ते 21 फेब्रुवारी, दिल्ली
तिसरी कसोटी : 1 ते 5 मार्च, धर्मशाला
चौथी कसोटी – 9 ते 13 मार्च, अहमदाबाद

Back to top button