टीम इंडियाचा पहिल्या कसोटीत विजय, जाणून घ्या WTC Final सामन्याचे नवे समीकरण
पुढारी ऑनलाईन डेस्क : फिरकीपटूंनी केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने आज ( दि.११ ) दिमाखदार विजय नोंदवला. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. आजच्या विजयामुळे आता कसोटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यास ( WTC Final ) पात्र ठरण्यासाठीच्या समीकरणात कोणता बदल झाला आहे याविषयी जाणून घेवूया…
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि १३२ धावांनी पराभव केला आहे. या कामगिरीमुळे कसोटी क्रिकेट विश्वचषकामधील अंतिम सामन्यास पात्र ठरण्यासाठीच्या समीप भारत आला आहे. सध्या कसोटी क्रिकेटच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ अग्रस्थानी आहे. तर दुसर्या क्रमाकांवर भारत आहे. तिसर्या व चौथ्या स्थानावर अनुक्रमे श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका हे संघ आहेत.
भारताला मोठी संधी
आता दक्षिण अफ्रिका संघ हा वेस्ट इंडिज विरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. जर दक्षिण आफ्रिका संघाने हे दोन्ही कसोटी सामने जिंकले तर या संघाचे गुणे ५५.५५ टक्के होतील. जर भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतील दोन सामने जिंकले आणि दोन सामने हरले तरी भारतीय संघाचे गुणे ५६.९४ टक्के इतके होतील. याचा अर्थ ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतील आणखी एक सामना भारताने जिंकल्यास टीम इंडियाचा कसोटी विश्वचषकच्या गुणतालिका यादीतील दुसरा क्रमांक अबाधित राहणार आहे. म्हणजे कसोटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक मारण्याची भारताला मोठी संधी आहे.
WTC Final : श्रीलंका संघ न्यूझीलंड विरुद्ध खेळणार दोन कसोटी सामने
सध्या कसोटी क्रिकेटच्या गुणतालिकेत श्रीलंका संघ तिसर्या स्थानी आहे. हा संघ आता न्यूझीलंड विरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. जर श्रीलंका संघ दोन्ही कसोटी जिंकण्यास अपयशी ठरला आणि भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या माकिलेत दोन कसोटी जिंकला तर कसोटी क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यात टीम इंडिया धडक मारेल. जर श्रीलंका संघाने न्यूझीलंडचा दोन्ही कसोटीत पराभव केल्यास या संघाचे गुण ६१. ११ टक्के इतके होतील. यानंतर मात्र भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील चार सामन्यांपैकी तीन सामने जिंकावे लागतील.श्रीलंका संघाने न्यूझीलंड विरुद्धच्या एका कसोटीत पराभव झाला आणि एक कसोटी अनिर्णित राहिली तर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन कसोटी जिंकल्या तरी अंतिम सामन्यातील आपलं स्थान निश्चित करेल.
WTC Final : ऑस्ट्रेलिया संघाचे स्थान निश्चित
सध्या ऑस्ट्रेलिया संघ भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत चार सामने खेळणार आहे. या चारही सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव झाला तरी हा संघ गुणतालिकेत दुसर्या स्थानावरच राहणार आहे. त्यामुळे या संघाचे अंतिम सामन्यात खेळणे निश्चित आहे.
क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये टीम इंडिया बून शकते ‘नंबर १’
टीम इंडिया क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये म्हणजे टी-20, वनडे आणि कसोटीत नंबर १ होण्याची शक्यता आहे. सध्या टीम इंडिया वनडे आणि टी-२० मध्ये जगातील नंबर १ वर आहे. तर कसोटीमध्ये दुसर्या क्रमाकांवर आहे. भारतीय संघाने या मालिकेत 2-0किंवा यापेक्षा मोठा मालिका विजय मिळविल्यास टीम इंडिया कसोटीतही नंबर १ होणार आहे.
हेही वाचा :
- IND vs AUS 1st Test Day 3 : भारताचा मोठा विजय; ऑस्ट्रेलियाचा एक डाव, १३२ धावांनी केला पराभव
- Asian Indoor Athletics Championships | आशियाई इनडोअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप : तजिंदरपालसिंग तूरला गोळाफेकमध्ये सुवर्णपदक