पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाने आपले पूर्ण लक्ष अगामी वन डे विश्वचषक स्पर्धेवर केंद्रीत केले आहे. देशासाठी तिसरा विश्वचषक जिंकणे हे आमचे ध्येय आहे, असा निर्धार कर्णधार हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) व्यक्त केला. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यापूर्वी सोमवारी त्याने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तो बोलत होता.
पंड्या (Hardik Pandya) म्हणाला, दुर्दैवाने 2022 मध्ये आम्ही टी 20 विश्वचषक जिंकू शकलो नाही. पण यंदा वन डे विश्वचषक स्पर्धेत तसे होणार नाही. टीम इंडिया आपल्या चाहत्यांना निराश करणार नाही, असा विश्वासही त्याने दिला. कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याबद्दल हार्दिकने मत मांडले. तो म्हणाला, मला प्रथम मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पूर्णपणे तंदुरुस्त होऊ द्या. त्यानंतर मी कसोटी क्रिकेटचा विचार करेन, असे स्पष्ट केले.
मला फक्त मेहनतीची भाषा कळते. दुखापत माझ्या हातात नाही, पण मेहनतीवर माझा विश्वास आहे. 2022 हे वैयक्तिकरित्या माझे सर्वोत्तम वर्ष होते. पण आम्ही टी 20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावण्यात अपयशी ठरलो. पण हार-जीत हा खेळाचा भाग असल्याची भावना त्याने व्यक्त केली.
मंगळवारी होणा-या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल याबाबत हार्दिकने खुलासा केला नाही. संघात कुणाला संधी देण्यात आली आहे, हे सामना सुरू होण्यापूर्वी कळेल, असे त्याने सांगितले.
हार्दिकच्या नेतृत्वाखाली भारताने एकूण चार टी-20 सामने खेळले आहेत. ज्यापैकी भारताने तीन जिंकले आहेत आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. कर्णधार म्हणून हार्दिकची वैयक्तिक कामगिरी चांगली आहे. त्याने पाच डावात 108 धावा केल्या आहेत. यादरम्यान तो दोनदा नाबाद राहिला आहे. त्याने जवळपास 160 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. तर कर्णधार असताना त्याने एकूण सहा षटके फेकली असून ज्यात त्याला 63 धावांच्या मोबदल्यात केवळ एक विकेट मिळाली.