पुढारी ऑनलाईन डेस्क : Gambhir vs Rahul : टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुलसाठी गेले काही महिने खूप वाईट गेले आहेत. अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये धावा करण्यात तो सातत्याने अपयशी ठरला आहे. त्यामुळे भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने राहुलवर निशाणा साधत त्याला यापुढे प्लेइंग 11 मध्ये सहजासहजी स्थान मिळणार नसल्याचे म्हटले आहे. जानेवारीपासून सुरू होणाऱ्या भारत-श्रीलंका मालिकेत त्याला खेळण्याची संधी मिळालीच तर त्याने धावा करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असा सल्लाही गंभीर यांनी दिला आहे.
आयपीएलमध्ये गौतम गंभीर हा लखनौ सुपर जायंट्सचा मेंटर आहे आणि या संघाचे नेतृत्व केएल राहुल करतो. त्यामुळे गंभीरने जे काही म्हटलं आहे, ते ऐकायला केएल राहुलच्या चाहत्यांना नक्कीच आवडणार नाही. पण माजी खेळाडूने चूकीचे काही म्हटलेले नाही, असेही अनेकांना वाटते. त्यामुळे येणा-या काळात राहुलला धावा काढूनच आपल्या वरील टीकेला उत्तर देणे गरजेचे आहे. (Gambhir vs Rahul)
गंभीर पुढे म्हणाला, 'अलीकडे इशान किशन आणि शुभमन गिल यांच्या कामगिरीचा आलेख उंचावला आहे. त्यामुळे केएल राहुलला यापुढे प्लेइंग इलेव्हनमध्ये सहज स्थान मिळणे अवघड आहे. विशेष म्हणजे इशानच्या जबरदस्त प्रदर्शनामुळे राहुलचा मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत. टी 20 विश्वचषक स्पर्धा, तसेच त्यानंतर बांगलादेश दौऱ्यात राहुल धावा करू शकला नाही. परिणामी खराब कामगिरी फटका त्याला सहन करावा लागला आहे. अगामी श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याला उपकर्णधारपदावरून हटवण्यात आले आहे. यासोबतच श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतही त्याला टीम इंडियातून डच्चू देण्यात आला आहे,' असेही त्यांनी टोला लगावला. (Gambhir vs Rahul)
स्टार स्पोर्ट्स शो ए चॅट विथ चॅम्पियन्समध्ये गंभीर म्हणाला, 'तुम्ही फक्त तुमच्या हातात काय आहे यावर नियंत्रण ठेवू शकता. तुम्ही निवडकर्त्यांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. पुढच्या मालिकेत काय होणार आहे ते तुम्ही नियंत्रित करू शकत नाही. तुम्हाला श्रीलंकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामने मिळाले आहेत. राहुलला त्यात संधी मिळालीच तर त्याने त्याचे सोने करावे. ज्या क्षणी तुम्ही अनियंत्रित गोष्टींबद्दल विचार करायला सुरुवात करता, याचा अर्थ तुम्ही स्वतःवर अवाजवी दबाव टाकत आहात असा होतो,'
'कोणताही खेळाडू अस्पृश्य नाही आणि केएल राहुलला इलेव्हनमध्ये आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी धावा कराव्या लागतील. जर राहुलने कामगिरी केली नाही तर त्याची जागा कोणीतरी दुसरा घेईल. विराट कोहली आणि रोहित शर्मा याच्याबाबतही हेच घडेल. जर त्यांनी कामगिरी केली नाही तर तुम्ही त्यांच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असेच आहे,' अशी स्पष्ट भूमिका गंभीर यांनी मांडली. (Gambhir vs Rahul)