IND vs ENG : सेमीफायनलमध्ये भारताचे पारडे जड | पुढारी

IND vs ENG : सेमीफायनलमध्ये भारताचे पारडे जड

मेलबर्न, वृत्तसंस्था : टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेतील सुपर-12 मधील ग्रुप 2 मध्ये शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेला पराभूत करून स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. भारताबरोबरच न्यूझीलंड, इंग्लंड व पाकिस्तान यांनीही अंतिम चारमध्ये प्रवेश केला. पहिला सेमीफायनल सिडनीत न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात बुधवारी (9 नोव्हेंबर) तर दुसरा सेमीफायनल भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात अ‍ॅडलेड येथे गुरुवारी (10 नोव्हेंबर) होणार आहे. यापूर्वीच्या आकडेवारीवरून सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचेच पारडे जड असल्याचे स्पष्ट होते.

टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यर्ंत भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) या दोन तुल्यबळ संघांत तीन वेळा गाठ पडली आहे. यामध्ये दोन भारताने तर एक सामना इंग्लंडने जिंकला आहे. दक्षिण आफ्रिकेत 2007 मध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिल्यांदा गाठ पडली. याच सामन्यात युवराजने स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात सहा षटकार ठोकण्याचा पराक्रम केला होता. हा सामना भारताने 18 धावांनी जिंकला होता. त्यानंतर 2009 मध्ये झालेल्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडने भारताला अवघ्या तीन धावांनी पराभूत केले होते. त्यानंतर 2012 मध्ये झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने इंग्लंडला एकतर्फी पराभूत करत 90 धावांनी विजय मिळविला होता. असे असले तरी टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात भारत आणि इंग्लंड यांच्यात नॉकआऊटमध्ये एकदाही गाठ पडलेली नाही.

पाक सहाव्यांदा अंतिम चारमध्ये

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या या वर्ल्डकपमध्ये पाकला अनपेक्षितपणे सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळाला आहे. असे असले तरी पाकने सलग दुसर्‍यांदा आणि एकूण सहाव्यांदा सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर न्यूझीलंडने सलग तिसर्‍यांदा आणि एकूण चौथ्यांदा अंतिम चारमध्ये प्रवेश केला आहे. पाक आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सेमीफायनल होणार आहे. आकडेवारीचा विचार केल्यास टी-20 या प्रारूपात या दोन्ही संघांत आतापर्यंत 28 वेळा गाठ पडली आहे. यामध्ये पाकने 17 तर न्यूझीलंडने 11 सामन्यांत विजय मिळविला आहे. तर टी-20 वर्ल्डकपमध्ये या दोन्ही संघांत 6 वेळा गाठ पडली असून पाकिस्तानने 4 तर न्यूझीलंडने 2 विजय मिळविले आहेत.

28 टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकूण 43 सामने खेळले आहेत. यामध्ये टीम इंडियाने 28 सामन्यांत विजय मिळविताना 14 पराभव पत्करले आहेत. एकदा अजिंक्यपद मिळविले आहे. सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत भारत अव्वल स्थानी आहे. त्यानंतर पाकिस्तान दुसर्‍या (45 सामन्यांत 27 विजय), न्यूझीलंड तिसर्‍या (41 सामन्यांत 23 विजय) आणि इंग्लंड चौथ्या (42 सामन्यांत 22 विजय) स्थानी आहे.

12 क्रिकेटच्या टी-20 प्रारूपात भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपर्यंत एकूण 22 सामने झाले आहेत. यामध्ये टीम इंडियाने 12 सामन्यांत विजय मिळविला आहे. तर इंग्लंडने 10 लढती जिंकल्या आहेत.

कुमार धर्मसेना-पॉल रिफेल ‘ऑन फिल्ड अम्पायर’ 

भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारी होणार्‍या दुसर्‍या सेमीफायनलसाठी आयसीसीने पंच आणि सामनाधिकार्‍यांच्या नावांची सोमवारी घोषणा केली. 10 नोव्हेंबरला होणार्‍या या सामन्यासाठी कुमार धर्मसेना आणि पॉल रिफेल हे ऑन फिल्ड पंच असतील. तर क्रिस गॅफनी हे तिसरे तर रॉड टकर हे चौथे अम्पायर असतील. तसेच डेव्हिड बून हे मॅच रेफरीच्या भूमिकेत दिसतील.

हेही वाचा…

Back to top button