PAK T20 WC : रोहितचा संघ जिंकू दे, आम्हाला सेमी फायनलचं तिकीट मिळू दे! पाकचे टीम इंडियासाठी साकडे | पुढारी

PAK T20 WC : रोहितचा संघ जिंकू दे, आम्हाला सेमी फायनलचं तिकीट मिळू दे! पाकचे टीम इंडियासाठी साकडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : PAK T20 WC : टी 20 विश्वचषक स्पर्धेमधून बाहेर होण्याच्या मार्गावर असलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. स्पर्धेतील सुरुवातीचे दोन्ही सामने गमावलेला बाबर आझमचा संघ आज (दि. 30) पर्थमध्ये नेदरलँड्सविरुद्ध तिसरा सामना खेळणार आहे. समीकरणानुसार, जर पाक संघाला सेमी फायनलच्या शर्यतीत टिकून राहायचे असेल, तर डच संघाला आजच्या सामन्यात मात द्यावीच लागेल. याशिवाय पाकिस्तानची नजर बांगलादेश विरुद्ध झिम्बाब्वे आणि भारत विरुद्ध द. आफ्रिका सामन्यावर असेल. भारत आणि बांगलादेश संघांनी आपपले सामने जिंकावेत यासाठी ते प्रार्थना करतील. किंबहुना, भारत आणि बांगलादेशच्या विजयानेच पाकिस्तानच्या सेमी फायनल गाठण्याच्या आशा जिवंत राहतील. कसे ते जाणून घेऊया…

पाकिस्तानला सेमी फायनल गाठायची असेल तर त्यांना त्यांचे उर्वरित तिन्ही सामने जिंकावे लागतील तसेच झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल. जर पाकिस्तानने तिन्ही सामने जिंकले तर ते जास्तीत जास्त 6 गुणांपर्यंत पोहोचू शकतील. तर द. आफ्रिका आणि झिम्बाब्वे त्यांनी त्यांच्या उरलेल्या तीन सामन्यांपैकी दोन गमावले तर ते जास्तीत जास्त 5-5 गुणांपर्यंत पोहोचू शकतील. या समीकरणानुसार सर्व काही घडत गेले तर पाकिस्तान सेमी फायनल गाठू शकतो. (PAK T20 WC pakistan team will expect victory from india and bangladesh)

बांगलादेश व्यतिरिक्त झिम्बाब्वेच्या संघाची चर्चा करायची झाल्यास त्यांना पुढील दोन सामने भारत आणि नेदरलँड्सविरुद्ध खेळायचे आहेत. आज (दि. 30) बांगलादेशने या संघाला हरवले तर पाकिस्तानच्या आशा काहीशा पल्लवीत होतील. कारण झिम्बाब्वेकडून टीम इंडिया पराभूत होणे कठीण आहे. एकंदरीत झिम्बाब्वेचा संघ केवळ नेदरलँड्सविरुद्ध विजयाची नोंद करू शकतो अशी शक्यता आहे. त्यांनी उर्वरित तीनपैकी दोन सामने गमावल्यास ते उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडू शकतात. (PAK T20 WC pakistan team will expect victory from india and bangladesh)

दुसरीकडे, द. आफ्रिकेच्या परफॉर्मन्सकडे एक नजर टाकल्यास भारताव्यतिरिक्त त्यांना पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध आणखी दोन सामने खेळायचे आहेत. भारताने आज द. आफ्रिविरुद्ध विजय मिळवल्यास, त्या पुढचा पाकिस्तान विरुद्ध द. आफ्रिका हा सामना व्हर्च्युअल उपांत्यपूर्व फेरीचा सामना म्हणून खेळला जाईल. तेव्हा पाकिस्तान उपांत्य फेरीत जाणार की नाही ते याच सामन्यातून स्पष्ट होईल. त्यामुळे पाक क्रिकेट संघासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.

Back to top button