

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs PAK T20 World Cup : टी 20 विश्वचषक स्पर्धेसाठी सुपर 12 मध्ये आधीच आपले स्थान निश्चित केलेल्या संघांमध्ये सध्या सराव सामने खेळले जात आहेत. टीम इंडियाने पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला आणि तो जिंकला. स्पर्धेतील सुपर 12 फेरीचे सामने 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. 23 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये महामुकाबला आहे. त्यासाठी दोन्ही संघ जय्यत तयारी करत आहेत. दरम्यान, पाकिस्तानी संघाला एक मोठा धक्का बसला आहे, ज्याची कोणालाच अपेक्षा नव्हती. त्यामुळे आता पाकिस्तानी संघाला दुसरी संधी मिळणार नाही हे निश्चित झाले आहे.
खरं तर, भारतीय संघाने 17 ऑक्टोबर रोजी खेळला गेलेला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सराव सामना सहा धावांनी जिंकला. त्याच दिवशी संध्याकाळी याच स्टेडियमवर पाकिस्तान विरुद्ध इंग्लंडचा सामना झाला. त्या सामन्यात पाक संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानला विश्रांती देण्यात आली होती. त्याचवेळी गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने ब-याच कालावधीनंतर प्लेईंग इलेव्हनमध्ये पुनरागमन केले. या सामन्यासाठी कर्णधार बनवण्यात आलेल्या शादाब खानने शाहीनला फक्त दोन षटके टाकायला दिली. यानंतर पाकिस्तानला ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन गाबा येथे दुसरा सामना खेळण्याची संधी मिळाली. पण हा सामना पूर्ण होऊ शकला नाही आणि पावसामुळे रद्द झाला. विशेष म्हणजे अफगाणिस्तान संघाने 20 षटके फलंदाजी केली, मात्र पाकिस्तानची फलंदाजी सुरू होताच पाऊस सुरू झाला. काही वेळ प्रतीक्षा केल्यानंतर सामना रद्द झाल्याचे घोषित करण्यात आले. (IND vs PAK T20 World Cup)
बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान पहिल्या सामन्यात खेळले नाहीत आणि दुसऱ्या सामन्यात त्यांना फलंदाजी करता आली नाही. सामना रद्द झाला तोपर्यंत बाबर आझमने सहा चेंडूंत सहा धावा केल्या होत्या आणि मोहम्मद रिझवान आठ चेंडूनंतरही खाते उघडू शकला नव्हता. यामुळे त्याला एकप्रकारे सरावाची संधी मिळाली नाही. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान हे पाकिस्तानसाठी एकमेव मॅचविनर आहेत आणि त्या दोघांपैकी कुणालाही सराव करण्याची संधी मिळाली नाही. दुसरीकडे टीम इंडियाबद्दल बोलायचे झाले तर भारताने त्यांच्या पहिल्याच सामन्यात जवळपास सर्वच मोठ्या खेळाडूंना संधी दिली होती. सर्वांनी फलंदाजी केली आणि गोलंदाजीतही सहा गोलंदाजांनी हात आजमावला. पण न्यूझीलंड विरुद्धचा सराव सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. आता ना भारताचा सराव सामना आहे ना पाकिस्तानला संधी आहे. यापूर्वी टीम इंडियाने आणखी दोन सराव सामने खेळले होते. आता 23 ऑक्टोबरला टीम इंडिया आणि पाकिस्तानचा संघ मेलबर्नच्या मैदानावर आमने-सामने येतील. तेव्हा टीम इंडियाने आपली पूर्ण तयारी केली असेल, तर पाकिस्तानी अपूर्ण तयारीसह मैदानात उतरेल. याचा फायदा टीम इंडियाला मिळू शकतो. (IND vs PAK T20 World Cup)
यूएईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये दोन सामने खेळले गेले. पहिला सामना भारतीय संघाने पाच गडी राखून जिंकला होता, तर दुसरा सामना पाकिस्तानने जिंकला होता. युएईमधील दुबईचे मैदान हे पाकिस्तानसाठी घरच्या मैदानासारखे आहे. पण ऑस्ट्रेलियातील मैदानांबाबत असे चित्र नाही. पाकिस्तानला तयारीची पूर्ण संधी मिळालेली नाही, याचा फटका पाकिस्तानला नक्केच बसेल असे अनेकांचे म्हणणे आहे. (IND vs PAK T20 World Cup)