T20 World Cup : तीन वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियाला जाणार, श्रेयस अय्यरच्या मार्गात अडथळे! | पुढारी

T20 World Cup : तीन वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियाला जाणार, श्रेयस अय्यरच्या मार्गात अडथळे!

पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 World Cup 2022 : भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेनंतर टीम इंडियाचा दुसरा संघ आता ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, तीन वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियाला रवाना होणार असल्याची बातमी आहे. याबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतेही अपडेट देण्यात आलेले नसले तरी तीन वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियाला जाण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. हा संघ ऑस्ट्रेलियात आल्यानंतर भारताकडे एकूण 15 खेळाडू असतील. मात्र, स्टँडबाय खेळाडूंपैकी श्रेयस अय्यर आणि रवी बिश्नोई अद्याप ऑस्ट्रेलियाला जात नसल्याची बातमी आहे. (T20 World Cup)

जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद शमी मुख्य संघात सामील होणार

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टी 20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागा कोणता खेळाडू घेईल याबद्दल सतत्याचे चर्चा होत होती. मात्र, यात मोहम्मद शमीचे नाव आघाडीवर होते. पण त्याच्या फिटनेसबाबत काही गोष्टी समोर आल्या होत्या, त्यानंतर त्याला एनसीएमध्ये पाठवण्यात आले होते. आता असे वृत्त आहे की मोहम्मद शमीने त्याची फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली आहे आणि आता तो बुमराहच्या जागी टी 20 विश्वचषक स्पर्धेत खेळणार असल्याचे समजते आहे. परंतु बीसीसीआयने अद्याप याची घोषणा केलेली नाही. त्याचवेळी, दीपक चहरची दुखापत गंभीर आहे, म्हणजेच तो आता वर्ल्डकपला मुकणार आहे. त्याला मुख्य संघात स्थान देण्यात आले नसले तरी तो स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत होता. मात्र तो आता ऑस्ट्रेलियाला जाऊ शकणार नाही. दरम्यान, आधीच स्टँडबाय असलेला शमी बुमराहची जागा घेणार असल्याची बातमी आहे. तर दुसरीकडे आता स्टॅम्डबाय खेळाडूंच्या यादीतही बदल झाल्याचे समजते आहे. यात मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश करण्यात आल्याचे वृत्त आहे. (T20 World Cup)

श्रेयस आणि बिश्नोई ऑस्ट्रेलियाला जाणार नाहीत…

दरम्यान, स्टँडबाय खेळाडू असलेले श्रेयस अय्यर आणि रवी बिश्नोई अद्याप ऑस्ट्रेलियाला जाणार नसल्याचेही वृत्त आहे. मात्र ते का जात नाहीत याबाबत चित्र स्पष्ट होत नाही. श्रेयस अय्यर सध्या दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळत होता. काल (दि. 11) झालेल्या तिस-या आणि शेवटच्या सामन्यात भारताने द. आफ्रिकेचा पराभव केला आणि तीन सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. या मालिकेतील अय्यरने चमकदार कामगिरी केली. दुस-या सामन्यात त्याने झुंझार शतक फटकावले.

दरम्यान, टी 20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी 23 ऑक्टोबरला होणार आहे. या सामन्याला अजून एक आठावड्याहून अधिक कालावधी आहे. त्यामुळे श्रेयस अय्यर आणि रवी बिश्नोई हे दोन्ही खेळाडू येणा-या काही दिवसांत ऑस्ट्रेलियाला जाण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत बीसीसीआयकडून कधी अपडेट येते हे पाहावे लागेल. (T20 World Cup)

दीपक चहर टी 20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर

वेगवान गोलंदाज दीपक चहर ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. त्यांच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे. 30 वर्षीय चाहरचा स्टँड बायमध्ये समावेश करण्यात आला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या टी 20 मालिकेत तो दुखापतग्रस्त झाला होता. सध्या तो बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे.

Back to top button