जागतिक कसोटी अजिंक्यपद : टीम इंडिया अव्वलस्थानी

जागतिक कसोटी अजिंक्यपद : टीम इंडिया अव्वलस्थानी

लंडन ; वृत्तसंस्था : उमेश यादव आणि जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली गोलंदाजांनी चांगली कामगिरी करीत टीम इंडिया चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंड विरुद्ध 157 धावांनी विजय मिळवून दिला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेतली. या विजयानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत टीम इंडिया अव्वल स्थानी कायम आहे. पाकिस्तानचा संघ दुसर्‍या आणि वेस्ट इंडिजचा संघ तिसर्‍या स्थानी आहे. तर, इंग्लंडचा संघ चौथ्या स्थानी आहे.

चौथ्या कसोटी विजयानंतर भारताचे 26 गुण

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारताचे 26 गुण झाले आहेत आणि संघाची विजयाची टक्केवारी 54.17 आहे. ओव्हलमधील पराभवानंतर इंग्लंडची विजयी टक्केवारी 29.17 अशी आहे आणि संघ 14 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

पाकिस्तानचा संघ 12 गुणांसह दुसर्‍या स्थानी आहे आणि संघाची विजयी टक्केवारी 50 आहे. तिसर्‍या स्थानी वेस्ट इंडिजचा संघ असून, त्यांचेदेखील 12 गुण आहेत आणि विजयी टक्केवारी 50 आहे.

लीडस् कसोटीनंतर भारताला झालेले दोन गुणांचे नुकसान

प्रत्येक कसोटी विजयासाठी 12 गुण असतात. सामना टाय झाल्यास 6 गुण, सामना ड्रॉ झाल्यास 4 गुण आणि पराभूत झाल्यास गुण मिळत नाहीत. भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या कसोटी मालिकेत 60 गुण मिळणार आहेत. या सर्व गुणांचा विचार केल्यास भारतीय संघाने आतापर्यंत इंग्लंड दौर्‍यात दोन सामने जिंकले आहेत आणि एक सामना ड्रॉ झाला आहे.

या कामगिरीनुसार भारताचे 28 गुण व्हायला हवे होते; पण लीडस्मध्ये खेळल्या गेलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्यानंतर आयसीसीने धीम्या षटकांच्या गतीसाठी भारत व इंग्लंड दोन्ही संघांचे 2-2 गुण कापले. त्यामुळे भारताचे 26 गुण झाले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news